रेल्वे गाड्यांचा प्रवास देखील रखडत रखडत सुरु आहे. 7 वाजून 26 मिनिटांनी पहिली विशेष लोकल कल्याणच्या दिशेने सोडण्यात आली. रात्रभर कार्यालयात मुक्काम केलेल्या नागरिकांनी लोकलने प्रवास करण्यासाठी गर्दी केली. सीएसटी ते ठाणे दरम्यान 'बेस्ट'ने विशेष बससेवा सुरु केली आहे.
मंगळवारची रात्र अनेकांना कार्यालयात, मित्राच्या, नातेवाईकांच्या घरी, रेल्वे स्थानकावर काढावी लागली. रात्री उशिरापर्यंत लोकलमध्ये अडकलेल्या गर्भवती महिला, अपंग व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जीआरपीचे कर्मचारी कार्यरत होते. कुर्ला ते शीव स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलेले असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीचा बोजवारा उडालेला आहे. मुंबई व परिसरातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे.