भाजपने एक जाहितरात सुरू केली होती मी लाभार्थी पण आम्ही स्वतः लाभार्थी कोण हे पडताळून पाहिले तर लक्षात आले की जनता नाही तर राज्याचे 16 मंत्री ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते खरे लाभार्थी झाल्याचा आरोप देखील जयंत पाटील यांनी केला. पाच राज्यात पराभव झाल्यावर भाजपने लोकांना फसवण्यासाठी 10 टक्के आरक्षण सवर्णांना देऊ केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अंबरनाथ माध्ये आता स्वतःची ताकद वाढवत आहे. लोकांना परिवर्तन हवे आहे ते परिवर्तन होणारच असा निर्धार जयंत पाटील यांनी अंबरनाथ येथील परिवर्तन सभेत केला
भाजप सरकारने लोकांना फसवलं आहे. पण आता लोक हुशार झाले आहेत. ओळखू लागले आहेत की कोण आपली फसवणूक करत आहे. भाजप सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. कायद्याचं राज्य राहीलं नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला.
लोक आता भाजपचे अच्छे दिन नाही तर भाजपचे किती दिन शिल्लक राहिले आहेत, असा विचार करत असल्याचा टोला देखील भुजबळ यांनी मारला आहे. भारतात भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे आपण सुद्धा लोकांच्या प्रमाणे विचार करून भाजपला हरवले पाहिजे असे मत छगन भुजबळ यांनी मांडले.
अंबरनाथ शहरांतर्गत भेदभाव केला जात आहे. पूर्व आणि पश्चिम असे सांगितले जात आहे. शहरातील पाणी, आरोग्य, रस्ते अशा सुविधा पुरवण्यामध्ये फरक केला जातो. एकाच बापाच्या दोन लेकरांमध्ये कोण दुजाभाव करू शकतं? असा जळजळीत सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. भाजपा सरकार शहरांचा विकास करण्यात अपयशी ठरत आहे. या गोष्टी़वर एकच पर्याय आहे. राष्ट्रवादीच्या साथीनं परिवर्तन करायचे असे आवाहन धनंजय मुंढे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.