बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (12:41 IST)

किसान विकास पत्र योजना : 124 महिन्यांत दुप्पट पैसे देऊ शकणारी ही योजना आहे तरी काय?

पैसे दुप्पट करणाऱ्या स्किमबद्दल तुम्ही ऐकलं असेल, त्याचे मीम्सही तुम्ही पाहिले असतील. सहसा अशा स्किम्स फसव्या असल्याचं निदर्शनास आलेलं आहे.
पण केंद्र सरकारचीही पैसे डबल करण्यासाठीची एक स्किम आहे, असं तुम्हाला सांगितलं तर?
 
होय, केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या भारतीय टपाल सेवा कार्यालयाकडून ही योजना चालवण्यात येते. इंडियन पोस्टच्या या योजनेत 124 महिने गुंतवणूक केल्यानंतरच दुप्पट पैशांचा परतावा आपल्याला मिळवता येतो.
 
किसान विकास पत्र योजना (KVP) असं या योजनेचं नाव आहे. योजनेचं नाव ऐकून असं वाटू शकतं की ही योजना शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येत असेल. पण तसं नाही. देशातील कोणताही नागरीक किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकतो.
 
KVP ही एक बचत योजना आहे. गुंतवणुकीत जास्त जोखीम घेण्याची इच्छा नसलेल्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणण्यात आली आहे.
 
या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला 124 महिने म्हणजेच 10 वर्षे आणि 4 महिने इतक्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते.
 
कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या पैशांच्या दुप्पट पैसे त्याला देण्यात येतात.
 
या योजनेअंतर्गत सरकार आपल्या गुंतवणुकीवर 6.9 % इतकं वार्षिक कंपाऊंट व्याज देतं.
 
किसान विकास पत्र स्किमअंतर्गत खातं उघडण्याचे तीन पर्याय आहेत.
1. सिंगल होल्डर टाईप अकाऊंट - हे खातं प्रौढ व्यक्ती स्वतःसाठी उघडू शकतात. आपल्या अल्पवयीन किंवा मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या पाल्याचं खातं उघडण्यासाठीही आई-वडिलांना परवानगी आहे.
 
2. जॉईंट ए टाईप - हे एकप्रकारे संयुक्त खातं आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त तीन व्यक्ती आपलं संयुक्त खातं सुरू करू शकतात. या प्रकारात खात्यातील पैसे काढण्याचे अधिकार तिघांना असतात.
 
3. जॉईंट बी टाईप - या प्रकारातही जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्त खातं उघडू शकतात. मात्र पैसे काढण्याचे अधिकार कोणत्याही एका व्यक्तीकडेच देण्यात आलेले असतात.
 
खातं कोण उघडू शकतो?
कोणताही प्रौढ व्यक्ती हे खातं उघडू शकतो.
10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अल्पवयीन पाल्याच्या नावानेही खातं उघडता येतं.
मानसिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या नावे त्याचे पालक खातं उघडू शकतात.
जास्तीत जास्त तीन व्यक्ती संयुक्त खातं उघडू शकतात.
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत 1 हजार रुपयांपासून ते आपल्याला हव्या तितक्या रकमेची गुंतवणूक करता येते.
ही रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास पॅन कार्डची माहिती जमा करावी लागते.
योजनेत गुंतवली जाणारी रक्कम ही 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास गुंतवणूकदाराला आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोताबाबतही माहिती द्यावी लागते.

खातं उघडण्यासाठी अर्ज कसा करावा?
किसान विकास पत्र खातं उघडण्यासाठी कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये अथवा बँकेत अर्ज करता येतो. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हे खातं उघडलं जाऊ शकतं. पण खातं उघडण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. ते खालीलप्रमाणे -
KVP अप्लीकेशन फॉर्म
आधार कार्ड
रहिवासी दाखला
वयाचं प्रमाणपत्र
पासपोर्ट साईझ फोटो
ऑफलाइन खातं उघडण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस अथवा बँकेत जावं लागेल. तिथून किसान विकास पत्र योजनेचा अर्ज घेऊन सर्वप्रथम तो भरावा.
 
सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून तो पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जमा करावा. या प्रक्रियेनंतर आपलं खातं तयार होतं.
हीच प्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला भारतीय पोस्ट सेवेच्या indiapost.gov.in या वेबसाईटवर जावं लागेलं.
डाव्या बाजूला मेन्यू दिसेल. तिथे असलेल्या पर्यायांपैकी Banking and Remittance वर क्लिक करा.
पुढे पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम हा पर्याय निवडावा. हे बटण दाबताच तुम्ही दुसऱ्या एका वेबपेजवर पोहोचाल.
 
याठिकाणी आपल्यासाठी KVP योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
पर्याय निवडल्यानंतर काही नियम दिसतात. तसंच ऑप्शन फॉर्म्स अव्हेलेबल हा पर्यायही याठिकाणी दिसतो. त्यावर क्लिक करून Application form for purchase of certificate डाऊनलोड करून घ्यावं.
हा फॉर्म भरून कागदपत्रे जोडावीत आणि फॉर्म सबमिट करावा. तुमचं खातं तयार होईल. भविष्यात खातं ट्रान्सफर करण्याची गरज भासल्यास याच वेबसाईटची तुम्हाला मदत लागेल.
 
खातं ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचा ट्रान्सफर फॉर्म इथे सहज मिळेल. किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन तुम्ही फॉर्म बी घेऊ शकता.
 
मुदतीपूर्वीच पैसे काढता येतील का?
काही परिस्थितींमध्ये मुदत संपण्याआधी पैसे काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर मुदतपूर्व पैसे काढता येऊ शकतात.
एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी लेखी परवानगी दिली, तर पैसे काढता येऊ शकतात.
कोर्टाच्या आदेशानंतरही हे पैसे काढले जाऊ शकतात.
गुंतवणूकदाराने एका वर्षाच्या आत पैसे काढल्यास त्याला कोणत्याच स्वरुपात व्याज मिळत नाही. उलट त्याला दंड भरावा लागतो.
1 ते 2 वर्ष 6 महिने या कालावधीत पैसे काढले तर जमा पैशांवर व्याज मिळत. पण यासाठीचा व्याजदर अत्यंत कमी असतो.
अडीच वर्षांनंतर पैसे काढल्यास तुम्हाला पूर्ण व्याजदर मिळतो. शिवाय कोणत्याही प्रकारचा दंडही लागू होत नाही.