शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (16:28 IST)

हातात मशाल घेऊन राज्यभर दौरा आणि एक दिवसाचं उपोषण करणार

पंकजा मुंडे यांनी 1 डिसेंबर रोजी फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर त्या काय बोलतील याकडे आज सर्वांचं लक्ष लागलं होतं. पंकजा मुंडे बंडखोरी करतील की पक्षांतर करतील याचा निर्णय आज होईल अशी चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देत आपण पक्षातच राहणार असल्याचं माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
 
आता बॉल भाजपच्या कोर्टात आहे. मी पक्षाला सोडणार नाही पण पक्षाला जर मला सोडायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा. भाजपने सर्व नाराज लोकांशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. 26 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कार्यालय काढून 27 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एक दिवसीय उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
 
गोपीनाथगडावरील कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
 
पंकजा मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे
पराभव वगैरे चिल्लर गोष्टींनी खचणारी मी नाही. ज्या मुंडे साहेबांच्या चितेला अग्नी दिल्याचं दुर्भाग्य माझ्या वाट्याला आलं.
मी एक डिसेंबरला पोस्ट लिहिली होती की 12 डिसेंबर ला बोलणार. तेव्हापासून माध्यमांचं लक्ष होतं.
सूत्रं एवढी हुशार होती तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतलेली तुम्हाला कसा कळला नाही.
निवडणूक निकाल ते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या प्रवासापर्यंत मी जो राजकारणाचा अनुभव घेतला तितका अनुभव गेल्या 15 वर्षांत आला नाही.
मुंडे साहेब गेल्यानंतर मी संघर्ष यात्रा काढली. माझ्यासोबत कुणीच नव्हतं पण लोकांनी मला साथ दिली.
माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. मी कधीही बंड करणार. पक्षाने जाहीर केलेला मुख्यमंत्री निवडून यावा म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत लढले.
डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, सुदर्शनजी आणि मोहन भागवत यांचा वारसा फक्त काही लोकांकडेच आहे का? आमच्याकडे नाही का?
मी कुणावर नाराज नाही कारण मला कोणाकडून काही अपेक्षा नाही.
पक्ष ही प्रक्रिया असते, त्याची मालकी कुणा एकाकडून नाही. या पक्षाचं नेतृत्व व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांनी भूषवलं आहे. आता अमित शहा अध्यक्ष आहे पुढे दुसरं कुणी येईल.
मला कोअर कमिटीतून मुक्त करा.
मी बंडखोर आहेच बंडखोर लोकच स्वातंत्र्य मिळवू शकतात.
मी मशाल घेऊन महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मी घरात बसून राहणार नाही. 26 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे.
27 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एक दिवसाचं उपोषण करणार आहे.
ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाला असेल त्या ठिकाणी मी जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांना आमच्यासाठी काही करायचं असेल तर मराठवाडा दुष्काळमुक्त करावा.