गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (19:55 IST)

दिपाली सय्यद शिवसेनेचा चर्चेतला चेहरा कसा बनल्या? अभिनय ते राजकारण असा आहे प्रवास

deepali sayyad
राज्यात सध्या मशिदींच्या भोंग्यांवरून राजकारण तापत असताना अनेक नेत्यांकडून राजकीय टीका केल्या जात आहेत. यांपैकीच एक आहेत शिवसेनेच्या 'दिपाली सय्यद'. त्या सातत्याने मनसे आणि भाजपला भोंगे आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून प्रत्युत्तर देताना दिसतायेत.
 
दिपाली सय्यद या अचानक चर्चेत का आल्या? दिपाली सय्यद यांची पार्श्वभूमी काय आहे? याबाबतचा हा आढावा...
 
कोणत्या वक्तव्यांमुळे आल्या चर्चेत?
काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालिसा पठण प्रकरणी अटक करण्यात आली. त्यादरम्यान खार पोलीस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यास भेटायला गेल्यावर त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला.
 
या हल्याचं समर्थन दिपाली सय्यद यांनी केलं होतं. त्या म्हणाल्या, "सोमय्याच काय, त्या कारमध्ये मोदी असते तरी ती कार फोडली असती. ही बाळासाहेबांची शिकवण आहे, जो नडला त्याला फोडला."
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवले. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचं जाहीर कौतुक केलं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी "ए भोगी, काहीतरी शिक आमच्या योगीकडून" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून ट्वीट केलं होतं.
 
त्याला दिपाली सय्यद यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं, "योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं फडणवीस बायकोला सोडणार का?"
 
या ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती.
 
त्याचबरोबर अमृता फडणवीस यांच्याकडून सातत्याने येणार्‍या राजकीय वक्तव्यांबाबत दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या, "मी फडणवीसांना एकच सांगते, घरातल्या दावणीची म्हैस शिवसेनेच्या वाट्याला सोडू नका. शिवसैनिक कोणालाही ऐकत नाहीत. अन्यथा तुमचं पुन्हा येईन, पुन्हा येईन हे स्वप्नच राहील."
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेत पुन्हा मशिदींवरचे भोंगे आणि जातीय द्वेष याचा उल्लेख केला. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
 
"जर दंगली झाल्या तर हे प्रेतं तरी बघायला येतील का? यामध्ये सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचं नुकसान होणार आहे. जर काही झालं तर अमित ठाकरे जातील परदेशात... इथे फक्त श्रध्दांजलीचे बोर्ड लागतील."
 
कोण आहेत दिपाली सय्यद?
दिपाली भोसले सय्यद यांचा जन्म 1 एप्रिल 1978 साली बिहारमध्ये झाला. बिहारच्या सीव्हीआर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
 
पण लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या दिपाली सय्यद यांनी 2006 साली सिनेसृष्टीतून त्यांच्या करिअरला सुरवात केली. बंदिनी, समांतर या दिपाली सय्यद यांच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरवातीच्या मालिका होत्या.
 
त्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिका, जाहिराती तसंच सिनेमांमध्ये काम केलं आहे. दिपाली सय्यद या उत्तम नृत्यांगना आहेत त्यामुळे अनेक रियालिटी शोमध्ये त्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसल्या.
 
'जाऊ तिथे खाऊ', चष्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिकांमधून त्यांची ओळख निर्माण झाली. 'जत्रा' सिनेमातील दिपाली सय्यद यांचं "ये गो ये, ये मैना पिंजरा बनाया सोने का" हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.
 
2008 साली दिपाली भोसले सय्यद यांनी दिग्दर्शक बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर दिपाली यांचं नाव सोफिया जहांगीर सय्यद असं ठेवण्यात आले. लग्नानंतर दिपाली सय्यद अभिनयात फारश्या रमल्या नाहीत. पण विविध रियालिटी शोच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांसमोर येत राहील्या.
 
राजकारणात प्रवेश?
दिपाली सय्यद या कालांतराने सामाजिक कार्यक्रमांमध्ये दिसू लागल्या. पूरग्रस्तांसाठी मदतकार्य, अनाथ आणि गरीब मुलींच्या लग्नाची जबाबदारी अशा कार्यात त्यांची उपस्थितीती दिसू लागली. 2014 साली त्यांनी आम आदमी पक्षाकडून अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना अपयश आलं.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीची या भागातील 'हॅट्रीक' मोडण्यासाठी शिवसेनेचे कळवा - मुंब्रा मतदारसंघातून दिपाली भोसले - सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली.
 
त्यावेळी निवडणुकीसाठी दिपाली सय्यद यांनी 'सोफिया जहांगीर सय्यद' नावाने होर्डिंग्ज लावून प्रचार केल्यामुळे सोईनुसार नावाचा आणि धर्माचा वापर करत असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती.
 
"बर्‍याचदा लोकं माझ्या आडनावामुळे मला बोलतात. लोकांना त्याचा फार त्रास होतो. मग या पाठोपाठ माझे आई- वडिल माझे संस्कार याविषयी चर्चा सुरु होतात. पण मी या गोष्टीला फारसे महत्त्व देत नाही," असं याबाबत प्रत्युत्तर देताना दीपाली सय्यद यांनी म्हटलं होतं.
 
पण या निवडणुकीतही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर काही दिवस त्या राजकारणात फारशा सक्रिय दिसत नव्हत्या. पण राजकारणात धर्मांचे मुद्दे गाजत असताना त्या काही दिवसांपासून पुन्हा सक्रिय झालेल्या बघायला मिळतायेत.