1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 8 जानेवारी 2023 (10:46 IST)

'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे कलाकार मालिका का सोडतायेत?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेला एक एक करून अनेक कलाकार राम राम ठोकत आहेत.'दयाबेन'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानी, 'टप्पू'ची भूमिका भव्य गांधी यांसारख्या कलाकारांनी मालिका सोडल्यानंतर आता दिग्दर्शकानेही मालिका सोडलीय.

दिशा वकानी, गुरचरण सिंह, शैलेश लोढा, भव्य गांधी यांनी आजवर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेला राम राम ठोकला आहे. त्यानंतर मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही मालिका सोडलीय.
माध्यमांमधील वृत्तांनुसार, 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आणि मालव राजदा यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये वाद झाला. त्यानंतर राजदांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
 
मालव राजदा हे मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसशी नाराज होते. मात्र, मालव राजदांनी बीबीसीशी बोलताना हे वृत्त फेटाळलं.
 
बीबीसीशी बोलताना मालव राजदा म्हणाले की, "होय, मी मालिका सोडलीय. मालिका सोडण्याचं कारण 14 वर्षे मालिकेसोबत काम करून वाटलं की, कम्फर्ट झोनमध्ये पोहोचलोय."
 
"मला वाटतं की, रचनात्मक रूपात पुढे जाण्यासाठी मालिका सोडून स्वत:ला आव्हान दिलं पाहिजे," असंही मालव राजदा म्हणाले.

कोण आहेत मालव राजदा?
मालव राजदा हे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेसोबत 14 वर्षे जोडलेले होते. ही मालिका 2008 मध्ये सुरू झाली आणि मालव राजदा सुरुवातीपासूनच मालिकेसोबत होते.
 
या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान त्यांची मुलाखत प्रिया आहुजासोबत झाली होती. प्रिया आहुजा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत रीता रिपोर्टरची भूमिका करते.
 
मालिकेदरम्यानच प्रिया आणि मालव यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनीही 2011 मध्ये लग्न केलं आणि त्यांना एक मुलगाही आहे.
दयाबेन, टप्पूनेही सोडली मालिका
डिसेंबर 2022 मध्ये या मालिकेतील प्रसिद्ध पात्र टप्पू म्हणजेच भव्य गांधी यानेही मालिका सोडली.
 
त्यापूर्वी 2017 मध्ये दयाबेन (अभिनेत्री दिशा वकानी) नेही मालिका सोडली होती. त्यावेळी त्यांना बाळ झालं होतं. मात्र, त्या मालिकेत परतल्याच नाहीत.
 
रोशन सिंह सोढी या पात्राची भूमिका साकारणारे अभिनेते गुरचरण सिंह यांनीही मालिकेला राम राम ठोकलाय.
 
तसंच, या मालिकेत नट्टू काका ही एक महत्त्वाची भूमिका साकारणारे कलाकार घनश्याम यांचं काही महिन्यांपूर्वी कॅन्सरने निधन झालं.
 
Published by- Priya Dixit