शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (08:46 IST)

३ मे पर्यंत रेल्वे आहे पूर्ण बंद मात्र ई-तिकीट प्रवाशांना रद्द करण्याची गरज नाही

देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद राहणार असून फक्त मालवाहतूक सुरु आहे. आयआरसीटीसीने मंगळवारी स्पष्ट केले की, 3 मे पर्यंत रद्द केलेल्या गाड्यांचे ई-तिकीट प्रवाशांना रद्द करण्याची गरज नाही. एएनआयच्या ट्विटनुसार आयआरसीटीसीने प्रवाशांना सांगितले आहे की, रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचे ई-तिकीट रद्द करण्याची गरज नाही. प्रवाशांना त्यांच्या तिकीटेचा परततावा मिळेल. ई-तिकीट आपोआप रद्द होईल आणि प्रवाशांना संपूर्ण परतावा मिळेल असे आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे.
 
देशात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून 3 मे पर्यंत देशभर लॉकडाऊन सुरु ठेवण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसचा संसर्गाचा पसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे गरजेचे आहे. देशव्यापी लॉकडाऊन वाढवल्यानंतर भारतीय रेल्वेने 3 मे पर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर तिकिट रद्द करणे आणि परताव्यसंदर्भात आयआरसीटीसीकडून माहिती देण्यात आली आहे.
 
तत्पूर्वी, भारतीय रेल्वेने सांगितले की, प्रिमियम गाड्या, मेल/एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल्वे, कोकण रेल्वेसह सर्व प्रवासी गाड्यांची सेवा 3 मे 2020 पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. लॉकडाऊन वाढवल्यानंतर सर्व देशी आणि आंतरराष्ट्रीय उड्डेणेदेखील 3 मे रोजी रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. नागरी उड्डायन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.