1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (22:58 IST)

Ind vs Pak : भारताची वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध जिंकण्याची पंरपरा कायम, सात विकेट्सनी दणदणीत विजय

india pakistan
वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकही मॅच न हारण्याचा विक्रम भारतीय संघाने कायम ठेवत, पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कपमधल्या आठव्या विजयाची नोंद केलीय.या विजयासह टीम इंडियानं पॉईंट टेबलमध्ये न्यूझीलंडला मागं टाकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
 
रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांची अर्धशतकं आणि गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानवर सात विकेट राखून सहज विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानने ठेवलेलं 192 धावांचं लक्ष्य केवळ 30.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
 
रोहित आउट झाल्यानंतर श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावलं. श्रेयसने 3 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 बॉलमध्ये धावांचीं खेळी केली. के. एल. राहुलनेही नाबाद राहत भारताचा विजय सुकर केला.
 
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांना भारतीय क्रिकेट टीमनं नवरात्रीपूर्वीच मोठी भेट दिली. भारतीय गोलंदाजांनी या विजयाचा पाया रचला. रोहित शर्मानं त्यावर कळस चढवत एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केलं.
रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनं केएल राहुलच्या मदतीनं विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रेयसनं क्रिकेट विश्वचषकातील पहिलं अर्धशतक झळकावलं. तो 53 तर राहुल 19 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं 2 तर हसन अलीनं 1 विकेट घेतली.
 
पाकिस्तानच्या फलंदाजांना संपूर्ण इनिंगमध्ये एकही षटकार लगावता आला नाही. रोहित शर्मानं मात्र एकट्यानेच पाच षटकार लगावले. एकदिवसीय कारकिर्दीमधील रोहित शर्मानं त्याचं 53 वं अर्धशतक झळकावलं.
 
भारताची आक्रमक सुरुवात
192 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं पहिल्याच बॉलवर चौकार लगावत आक्रमक सुरूवात केली. रोहित आणि शुबमन गिलनं पहिल्या दोन ओव्हर्समध्ये 22 धावा काढल्या. शुबमन गिल 16 धावा काढून बाद झाला.
डेंग्यूच्या आजारपणातून बऱ्या झालेल्या गिलनं हसन अलीचं तीन चौकार लगावत स्वागत केलं. त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.
 
शाहीन आफ्रिदीनं त्याला 16 धावांवर बाद केलं. शादाब खाननं त्याचा चांगला झेल घेतला.पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने शुबमनला आउट केलं.
 
पाकिस्तानला दोनशेच्या आत गुंडाळलं
 
त्याआधी भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॅास जिंकून पाकिस्तानला बॅटिंगंचं आमंत्रण दिलं होतं.
 
अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्तानची संपूर्ण इनिंग 42.5 ओव्हर्समध्ये 191 धावांवर संपुष्टात आली. संपूर्ण 50 ओव्हर्स खेळण्यातही त्यांना अपयश आलं.
 
भारताकडून जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा या सर्वांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
पाकिस्तानची घसरगुंडी
पाकिस्तानच्या चाहत्यांना बाबरच्या अर्धशतकाचा आनंद फारकाळ साजरा करता आला नाही. मोहम्मद सिराजनं 50 धावांवरच बाबरचा त्रिफाळा उडवला. बाबर आणि रिझवाननं तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागिदारी केली.
 
बाबर – रिझवान जोडी खेळत होती तोपर्यंत दोन्ही संघांना सामन्यात समान संधी असल्याचं दिसत होतं. बाबर बाद झाल्यानंतर पाकिस्तानची घसरगुंडी उडाली.
 
कुलदीप यादवनं एकाच ओव्हरमध्ये सौद शकील आणि इफ्तिखार अहमदला बाद केलं. त्यानंतर जसप्रीत बुमरानं एका अप्रतिम बॉलवर एक बाजू लावून धरलेल्या मोहम्मद रिझवानची दांडी उडवली. त्यापाठोपाठ शादाब खानलाही बुमरान 2 धावांवर बाद केलं.
 
2 बाद 155 वरुन 7 बाद 171 अशी पाकिस्तानची अवस्था झाली. भारतीय बॉलर्सनी फक्त 16 धावात पाकिस्तानच्या 5 विकेट्स घेत मॅचवर पकड मिळवली.
 
शादाब बाद झाल्यानंतर पाकिस्तान मोठी धावसंख्या करणार नाही हे स्पष्ट झाले होते. अखेर पाकिस्तानचा संपूर्ण डाव 191 धावांवर संपुष्टात आला.
 
बाबरचं पहिलं अर्धशतक
इमाम बाद झाल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या पाकिस्तानच्या सर्वात अनुभवी जोडीनं डाव सावरला. रिझवान रविंद्र जाडेजाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये रिझवान बचावला. त्यानंतर त्यांनी जाडेजा-कुलदीप या फिरकी जोडीविरुद्ध हे दोघं कोणताही धोका न पत्कारता खेळत होते.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं त्याचं अर्धशतक 57 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीनं पूर्ण केलं. एकदिवसीय क्रिकेटमधलं त्याचं हे 29 वं अर्धशतक असलं तरी भारताविरद्धचं पहिलंच अर्धशतक आहे.
 
विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यात मिळून बाबरनं फक्त 15 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं.
 
30 ओव्हर्समध्ये पाकिस्तानच्या 3 बाद 156 धावा
या सामन्याआधी पाकिस्तानच्या ज्या फलंदाजांची चर्चा होत होती त्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने सुरुवातीच्या पडझडीनंतर पाकिस्तानचा डाव सावरला होता.
 
तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली आहे. 30 ओव्हर्सचा खेळ संपल्यानंतर पाकिस्ताननं 3 बाद 156 धावा केल्या.
त्याआधी हार्दिक पांड्यानं भारताला दुसरं यश मिळवून दिलं. त्यानं आत्मविश्वासानं खेळत असलेल्या इमाम उल हकला 36 धावांवर बाद केलं. के.एल. राहुलनं त्याचा सोपा झेल घेतला.
 
सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये महागड्या ठरलेल्या मोहम्मद सिराजनं भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं अब्दुल्ला शफीकला 20 धावांवर बाद केलं.
 
पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागिदारी केली.
 
आठव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अब्दुल्ला शफिक सिराजचा इन्स्विंग होणारा चेंडू रोखू शकला नाही आणि तो पायचीत झाला. पाकिस्तानच्या शेवटच्या सामन्यात अब्दुल्ला शफीकने शतक झळकावलं होतं त्यामुळे त्याची विकेट महत्वपूर्ण होती.
 
विराट- रोहित जोडीची विकेट
इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक या जोडीनं पाकिस्तानला आश्वासक सुरूवात करून दिली होती. इमामनं सिराजच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फोर लगावले. बुमराला मात्र ही जोडी सांभाळून खेळत होती.
 
इमाम आणि शफीक यांची जोडी कशी फोडायची? या विषयावर विराट कोहली आणि रोहित शर्मा या आजी-माजी कर्णधारांमध्ये मैदानावर चर्चा झाली.
 
या विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. भारतानं यापूर्वी चेन्नईत ऑस्ट्रेलियाचा आणि अफगाणिस्तानचा दिल्लीमध्ये पराभव केला होता.
 
भारताची पुढील लढत 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध पुण्यात होणार आहे. तर पाकिस्तानचा पुढचा सामना 20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध बेंगळुरूमध्ये होईल.
 

























Published By- Priya Dixit