पादुकांची प्रार्थना
सांगावे कवणा ठाया जावे ।। कवणाते स्मरावे । कैसे काय करावें, कवण्यापरि मी रहावे । कवण येऊनि कुरुंदवाडीं स्वामीते मिळवावे ।।धृ।।
या हारी जेवावे व्यवहारी । बोलावे संसारी । घालुनि अंगिकारी । प्रतिपाळिसि जो निर्धारी । केला जो निजनिश्चय स्वामी कोठे तो अवधारी ।।सांगावे.।।
या रानी माझी करुणावाणी ।। काया कष्टी प्राणी ऐकूनि घेशील कानी । देशिल सौख्य निधानीं । संकटी होऊनि मूर्च्छित असतां पाजिल कवणा पाणी ।।सांगावे.।।
त्या वेळा । सत्पुरुषांचा मेळा । पाहतसे निजडोळां । लाविसि भस्म कपाळा । सांडी भय तूं बाळा । श्रीपाद श्रीवल्लभ म्हणती अभय तुज गोपाळा ।। सांगावे. ।।
हे पद नृसिंहवाडीला पालखीच्या शेवटास म्हटले जाते . गोपाळ स्वामी महाराजांनी हे पद केले आहे . देवाची इनाम गावे पुन्हा मिळवताना स्वामी महाराजांनी दत्त महाराजांचा धावा केला आणि दत्त महाराजांनी त्यांना भिऊ नकोस असे अभय दान दिले अशी कथा आहे . श्री गुरुदेव दत्त....