गोविंदांना १० लाखांचे सुरक्षा कवच; दहीहंडी पथकांसाठी राज्य सरकारची विशेष विमा योजना जाहीर
महाराष्ट्र राज्य सरकारने २०२६ च्या दहीहंडी उत्सवासाठी विशेष विमा योजना जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहीहंडी उत्सवासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सुमारे १ लाख ६० हजार गोविंदांना तब्बल १० लाख रुपयांचे विशेष विमा संरक्षण जाहीर केले आहे.
तसेच महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवात, मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने ही योजना राबवली जात आहे. तसेच मनोरा तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला १० लाख रुपये मदत दिली जाईल.
माहितीनुसार अपघातात दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा दोन्ही डोळे निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांची मदत दिली जाईल.
तसेच एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास नियम व अटींनुसार ५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळेल. तर मानवी मनोरा रचताना जखमी झालेल्या गोविंदांच्या उपचारासाठी १ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सोयही उपलब्ध असेल.
या योजनेचा लाभ फक्त 'महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन'कडे नोंदणीकृत असलेल्या अधिकृत पथकांमधील गोविंदांनाच मिळेल. तसेच विमा योजना केवळ मानवी मनोरा तयार करण्यात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठीच लागू आहे.
वयोमर्यादा व नियम
गोविंदांनी शासनाने ठरवून दिलेली वयोमर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच आयोजक आणि पथकांनी न्यायालय व प्रशासनाने दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच गोविंदांना यासाठी कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही. प्रति गोविंदा ७५ रुपये या दराने येणारा सर्व खर्च राज्य सरकार स्वतःच्या क्रीडा विकास निधीतून करणार आहे.
किती गोविंदांना कवच?
राज्यातील सुमारे १.६० लाख नोंदणीकृत गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ही योजना मानवी मनोरे रचताना होणाऱ्या जोखमी लक्षात घेऊन जाहीर करण्यात आली आहे.
ALSO READ: मुंबईकरांचे बजेट कोलमडणार! म्हशीचे दूध थेट १०२ रुपयांवर; सणासुदीच्या तोंडावर घाऊक दरात वाढ
