गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (14:21 IST)

61 लाख किंमत… अनेक सुरक्षा फिचर्स… तरीही सायरस यांचा जीव का वाचला नाही? काय चूक झाली?

ज्य़ेष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. खासकरुन त्यांच्या कारविषयी. त्यांची कार ही मर्सिडीज होती. Mercedes Benz GLC 220 D 4Matic या कारची किंमत ६० लाखांपेक्षा अधिक आहे. या कार मध्ये अनेक सुरक्षा फिचर्स आहेत. शिवाय तब्बल ७ एअरबॅग आहेत. हे सारे असूनही सायरस यांचा जीव का वाचू शकला नाही की या कारमध्ये काही अजून कमी आहे असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
 
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर मर्सिडीज कारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.सर्व कार्समध्ये सहा एअरबॅग्स देणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यापासून एअरबॅग्सची मोठी चर्चा ऐकायला मिळते. दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात जीव गमावतात. भारतातील रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जगातील सरासरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. नितीन गडकरींनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार जगातल्या एकूण वाहनांपैकी केवळ १ टक्के वाहने भारतात आहेत. मात्र जगात जितक्या नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, त्यापैकी १० टक्के मृत्यू हे एकट्या भारतात होतात. भारतात विकल्या जाणाऱ्या कार अधिक सुरक्षित करण्यावर केंद्र सरकार भर देत आहे. अपघात झाल्यास एअरबॅग ताबडतोब उघडतात आणि गाडीच्या चालकासह प्रवाशांचे प्राण वाचवतात.
 
एखादी कार दुसऱ्या वाहनाला, झाडाला, भिंतीला धडकते तेव्हा अचानक कारचा वेग कमी होतो. वेगातील हा अचानक झालेला बदल एक्सीलरोमीटर ओळखतो. यानंतर, एक्सीलरोमीटर एअरबॅगच्या सर्किटमध्ये सेन्सर सक्रिय करतो. एअरबॅग सर्किट सेन्सर अॅक्टिव्ह होताच हीटिंग एलीमेंटद्वारे करंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होतो. त्यामुळे एक स्फोट होऊन एअरबॅग्समध्ये गॅस तयार होतो. ज्यामुळे कंपनीने एअरबॅग म्हणून वापरलेली नायलॉनजी पिशवी फुगते. या पिशवीमुळे चालक किंवा इतर प्रवाशी कारचं स्टीयरिंग, समोरची काच किंवा सीटवर आदळत नाहीत. तसेच एअरबॅगमध्ये श्वास कोंडला जातो का किंवा गुदमरायला होतं का, अशी शंका कुणालाही येऊ शकते. पण असं होत नाही. कारण एअरबॅग एका फुग्यासारखं काम करते. तसेच एअरबॅगमध्ये इनहर्ट गॅस असतो. याने कोणतंही नुकसान होतं नाही. वास्तविक अपघातात प्रवाशांना डॅशबोर्ड किंवा बाजूला धडक बसण्यापासून रोखण्याचं काम एअरबॅग करते आणि प्रवाशाला पुन्हा सीटच्या दिशेने ढकलते, असं तज्ज्ञ सांगतात.
 
एक चूक जीवावर बेतल्याचं पाहायला मिळत आहे
अपघात नेमका कसा झाला याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एक चूक जीवावर बेतल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळेच अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या जीवावर बेतली आहे. अपघात झाला तेव्हा मर्सिडीज कार (एमएच 47 एबी 6705) गुजरातहून मुंबईकडे जात होती. सूर्या नदीच्या पुलावर येताच चारोटीजवळ दुभाजकाला कार धडकली. अनाहिता पंडोले कार चालवत असल्याचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे.
 
भारतात हायवे आणि एक्स्प्रेस हायवेवर वाहनांचा वेग किती असावा, याच्या मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत. मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या कारची भारतात वेगमर्यादा ताशी २४० किमी इतकी आहे. सायरस यांची कार नेमकी किती वेगाने धावत होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सायरस यांची कार १२५ ते १५० च्या वेगाने धावत असल्याचा अंदाज आहे. गाडी रस्त्यावर स्कीड झाल्यामुळे किंवा कुणालातरी वाचवण्याच्या नादात अथवा चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असे सांगितले जात आहे.
 
अपघातानंतर कारमधील काही व्यक्ती कारबाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे या व्यक्ती कारच्या बाहेर फेकल्या गेल्या की अपघातानंतर ते जीव वाचिण्यासाठी बाहेर पडले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सायरस हे स्वतःहून जखमी अवस्थेत बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला का, हे तपासानंतरच कळणार आहे. ज्या सुरक्षा भिंतीला कारने जबर धडक दिली, त्या भिंतीचे फारसे नुकसान झाले नाही कारचा मात्र चक्काचूर झाला. मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार अतिशय सुरक्षित मानल्या जातात. पण या गाड्यांना कुणी धडक दिली किंवा या गाड्या एखाद्या ठिकाणी धडकल्या, तर त्यांना काहीच होणार नाही, असे मानणेही चूक ठरेल. कोणत्याही धडकेत गाडीच्या आत बसलेल्या प्रवाशांवर त्यांचा परिणाम हा होतोच. धडक किती जोरात झाली, कोणत्या बाजूला झाली, या सगळ्या गोष्टींवरही अनेक बाबी अवलंबून असतात, असे संबंधित तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.