1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (19:02 IST)

महागाईचा परिणाम! या वस्तू होणार महाग

सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 च्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये तृणधान्ये, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढल्या, ज्यामुळे किरकोळ महागाई वाढली.
 
देशाची किरकोळ महागाई ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) द्वारे मोजली जाते. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 साठी किरकोळ महागाई दर 5.59 टक्क्यांवरून 5.66 टक्क्यांवर सुधारला आहे.
 
महागाईने रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेली 6 टक्क्यांची वरची मर्यादा ओलांडली आहे. मार्च 2026 ला संपणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी किरकोळ चलनवाढीचा दर 4 टक्के राखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि तो 2 टक्क्यांच्या वर किंवा खाली 2 ते 6 टक्क्यांच्या श्रेणीत राहण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 
नोव्हेंबर 2021 मध्ये घाऊक महागाई 16 वर्षांतील सर्वात जास्त होती. ऑक्टोबरमध्ये 12.54 टक्के असलेली घाऊक महागाई नोव्हेंबरमध्ये 14.23 टक्क्यांवर पोहोचली. 2021 मध्ये, WPI महागाई एप्रिलपासून सलग आठ महिने दुहेरी अंकात राहिली.
 
एकीकडे घरांच्या किमतीत, पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ होते असताना दररोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंच्या, खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होत आहे. साबण, डिशवॉशसारख्या वस्तू महाग झाल्या असून आता चॉकलेटच्या आणि कॉफीच्या किमतीत वाढ होणार आहे. नेस्ले कंपनी देखील लवकरच आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ करणार आहे.
 
या काळात कॉफी, घरगुती उत्पादन तसेच हेल्दी फूड प्रोडक्ट्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर पेट्रोल-डिझेल, खाद्य तेल महाग झालं आहे. तसेच साबण, डिशवॉश सारख्या वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेडने फेब्रुवारीमध्ये या वस्तूंच्या दरात 3 ते 10 टक्क्यांची वाढ केली आहे. बिस्किट निर्माता कंपनी ब्रिटानिया चौवथ्या वेळेस दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. मार्चपर्यंत बिस्कीटच्या किमतीमध्ये 10 टक्के दरवाढ होणार आहे. डाबरनं हनीटस, पुदीन हरा आणि चवनप्राशच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. आता पुन्हा एकदा डाबरनं दरवाढीसाठी तयारी केलीय.
 
जगातील सर्वात मोठी ब्युटी प्रॉडक्ट कंपनी लॉरियल देखील सर्वच वस्तूंच्या दरात 5 ते 6 टक्क्यांनी वाढ करणार असल्याची माहिती समोर येत आहे. खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनं, स्वयंपाक घरातील सर्वच वस्तू महाग होणार असून याचा मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसणार आहे.