1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2023 (10:23 IST)

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्धचा सामना रद्द, आता भारत सुपर-4 मध्ये कसा पोहोचेल? जाणून घ्या

IND Vs Pak Cricket
आशिया चषक स्पर्धेतील अ गटातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (2 सप्टेंबर) सामना झाला. पावसामुळे सामना रद्द झाला. भारतीय संघाला फलंदाजीची पूर्ण संधी मिळाली, मात्र बाबर आझमच्या संघाला एकही चेंडू खेळता आला नाही. उद्घाटनाच्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. भारताने या आवृत्तीत पहिला सामना खेळला आणि तोही अनिर्णित राहिला. आता भारतीय संघ सुपर-4 मध्ये कसा पोहोचणार याची सध्या चर्चा आहे. 
 
भारत- पाकिस्तानात सामना पूर्ण न झाल्याने दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी एक गुण सामायिक करण्यात आला. गट-अ पाकिस्तानने दोन सामन्यांत तीन गुण मिळवून सुपर-4 गाठले. तर भारताचा एका सामन्यात एक गुण आहे. नेपाळच्या खात्यात एकही अंक नाही. दुसरीकडे, ब गटातील श्रीलंकेचे एका सामन्यातून दोन गुण झाले असून बांगलादेशचे खातेही उघडलेले नाही. अफगाणिस्तान संघाला अजून पहिला सामना खेळायचा आहे.
 
भारतासाठी आता काय समीकरणे आहेत:
भारताचा नेपाळविरुद्धचा सामना करा किंवा मरो असा झाला आहे. जर संघ नेपाळविरुद्ध जिंकला तर सुपर-4 मध्ये जाईल. तो पराभूत झाल्यास नेपाळ पुढील फेरीत पोहोचेल.
जर नेपाळविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर भारताला एक गुण मिळेल आणि त्यामुळे त्याच्या एकूण गुणांची संख्या दोन होईल. अशा स्थितीत टीम इंडिया पुढची फेरी गाठेल.
पुढील फेरी गाठण्यासाठी नेपाळला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. त्याला चमत्कारिक कामगिरी करावी लागेल. सामना रद्द झाला तरी त्याला फक्त एक गुण मिळेल आणि तो दोन सामन्यांत एकूण एक गुण घेऊन बाद होईल.
 
हार्दिक पांड्या (87) आणि ईशान किशन (82) ने 138 धावांची विक्रमी भागीदारी करत भारताने शनिवारी आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला 267 धावांचे आव्हान दिले. शाहीन शाह आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व दहा बळी घेतले. शाहीनने 35 धावांत चार बळी घेतले. त्याच्याशिवाय हरिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफसमोर भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. या सामन्यात दुखापतीतून सावरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (22 चेंडूत 11 धावा), शुभमन गिल (32 चेंडूत 10 धावा), विराट कोहली (सात चेंडूत चार धावा) आणि श्रेयस अय्यर (नऊ चेंडूत 14 धावा) केल्या.
 



Edited by - Priya Dixit