बुधवार, 26 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By

कुसुमाग्रज कविता संग्रह

kusumagraj
वादळवेडी 
नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात
 
... उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात
 
हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात
 
ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्या
 
 - कुसुमाग्रज

************** 

मौन
शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली ,
म्हणाली गाणं गाऊ का ?
 
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली
शिणलेल्या झाडापाशी
सुगरण आली
झाड बोललं नाही
सुगरण निघून गेली
 
शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली जाळीत लापु का ?
झाड काही बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली
 
शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारच तुफान उठलं   
                                     
- कुसुमाग्रज
 
*******************
दूर मनोर्‍यात
वादळला हा जीवनसागर – अवसेची रात
पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात
 
भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा
सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा
 
पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली
 
प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्री
वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती
 
परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात
स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत
 
किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी
 
उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यात
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात
                                                                    
 - कुसुमाग्रज
 
*******************
अनंत
एकदा ऐकले काहींसें असें
असीम अनंत विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा इवला कण
 
त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्याशा शहरीं छोट्या घरांत
 
घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी
बांधून राहती कीटक कोळी
 
तैशीच सारी ही संसाररीती
आणिक तरीही अहंता किती?
परंतु वाटलें खरें का सारें?
क्षुद्र या देहांत जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे!
 
कांचेच्या गोलांत बारीक तात
ओतीत रात्रीत प्रकाशधारा
तशीच माझ्या या दिव्याची वात
पाहते दूरच्या अपारतेंत!
 
अथवा नुरलें वेगळेंपण
अनंत काही जेंत्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं
 
वसंतवैभव उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें अंतरी झरे
 
त्यानेच माझिया करी हो दान
गणावे कसे हें क्षुद्र वा सान?
                                                              
       - कुसुमाग्रज
*******************

स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या
 
स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा
 
सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती
 
मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा
रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला
 
जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला
हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा
                                                                    
 - कुसुमाग्रज
*******************
स्वार
 
घनदाट अरण्यांमधुनी
बेफाम दौडतो स्वार
 
अवसेच्या राक्षस रात्र
साचला नाभी अंधार
 
स्तब्धात नाडिती टापा
खणखणत खडकावरती
 
निद्राला तरूंच्या रांगा
भयचकित होऊनि बघती
 
गतिधुंद धावतो स्वार
जखमांची नव्हती जण
 
दुरांतील दीपांसाठी
नजरेत साठले प्राण
 
मंझिल अखेरी आले
तो स्फटिकचिरांचा वाडा
 
पाठीवर नव्हता स्वार
थांबला अकेला घोडा
                                                              
       - कुसुमाग्रज
 
*******************
 
सागर
 
आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
 
फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे
 
मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती
 
संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते
 
तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो
 
खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
 
प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
 
दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी
 
दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे
                                                                                         
  - कुसुमाग्रज
 
 
*******************

कोलंबसचे गर्वगीत 
 
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमळू दे तारे !
विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे
ढळुदे दिशाकोन सारे !
 
ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !
 
की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान
 
पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे
फुटू दे नभ माथ्यावरती
आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी
नाविका ना कुठली भिती
 
सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम
 
काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी
जपावे पराभुत प्राणा ?
 
कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !
 
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा !
 
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला” 
                                                                             
  - कुसुमाग्रज

************************* 

माझे जगणे होते गाणे 
जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी
 
माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे
 
आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे
 
राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे
 
जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

  - कुसुमाग्रज

************************* 
  डाव
तिन्ही सांजच्या धुक्यात
किती कळशी घेऊन
कुंकाउ कापली भरून
गेलीस तू
 
वाट पाहून माझे
शेवाळलेले डोळे
पाय भयभीत वाले नदीकडे
तेथे काळे तुझा डाव
घाट पदे घाटावर
रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी

- कुसुमाग्रज

************************* 

तिमिरातुनी तेजाकडे 
तिमिरातुनी तेजाकडे...
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
- कुसुमाग्रज

************************* 

बर्फाचे तट पेटुनि उठले 
बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
 
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?
 
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
 
सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
 
एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते
 
खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
 
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते
 
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनिषा जागतसे
 
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे. धगधगते
 
– कुसुमाग्रज

*********************** 
जीर्ण पाचोळा 
आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास
उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत
आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे
आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी
– कुसुमाग्रज

*********************** 
चार होत्या पक्षिणी त्या 
चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी
 
दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती
 
बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा
 
कोकिळेने काय केले ? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले
 
ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले

– कुसुमाग्रज

*********************** 
निरोप 
गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान
 
लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात
 
बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी
 
चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती
 
निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे
 
"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"
 
ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!
– कुसुमाग्रज

*********************** 
माझे जीवनगाणे 
माझे जगणे होते गाणे
सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर
तालावाचून वा तालावर
कधी तानांची उनाड दंगल
झाले सुर दिवाणे
 
कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे
 
आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केंव्हा फक्त बहाणे
 
राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रन्दन
अजाणतेचे अरण्य केंव्हा
केंव्हा शब्द शहाणे
 
जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदॄश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वाहणे
 
सुत्रावाचून सरली मैफल
दिवेही विझले सभागॄहातिल
कशास होती आणि कुणास्तव
तो जगदीश्वर जाणे
– कुसुमाग्रज
 
*********************** 
 
 
अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले.
 
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
 
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.
 
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
 
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा .
 
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
 
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
 
– कुसुमाग्रज
 
*********************** 
अजूनही 
अजूनही
निळया जांभळ्या नदीला
 
आंबेवनाची सावली
भेट पहिली वहिली
 
अकल्पित
... भेट दुरस्थपणाची
 
गर्भरेशमी क्षणाची
सौदामिनीच्या बाणाची
देवघेव.
 
गुलबक्षीच्या फुलानी
गजबजले कुपण
वेचू लागला श्रावण
मोरपिसे
 
ओल्या आभाळाच्या खाली
इद्रचापाचे तुकडे
तुझा करपाश पडे
जीवनास.
 
कधी रेताडीचे रस्ते
कधी मोहरली बाग
कधी प्रासादास आग
कर्पुराच्या
 
सप्तसुरातुनी गेले
माझ्या जीवनाचे गीत
तुझ्या सारगीची तात
साथ झाली.
 
बर्फवाट शिशिराची
आता पुढलिया देशी
तुझ्या मिठीची असोशी
अजूनही.
                                                       
– कुसुमाग्रज
 
*********************** 
 
गाभारा 
दर्शनाला आलात? या......
पण या देवालयात, सध्या देव नाही
 
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या समया आहेत, हिर्यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
 
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही......तस नाही, एकदा होता तो तिथे
 
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
 
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
 
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
 
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी...... आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
 
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
 
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर
त्याला पुन्हा..
 
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
 
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
                                                                             
 - कुसुमाग्रज
 
– कुसुमाग्रज
 
*********************** 

लिलाव
उभा दारी कर लावुनी कपाळा
दीन शेतकरी दावुनी उमाळा,
दूत दाराशी पुकारी लिलाव,
शब्द कसले ते-घणाचेच घाव !
पोसलेले प्राशून रक्त दाणे
उडुनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे
निघत मागुनि वाजले आणि थाळि,
गाडग्यांची ये अखेरीस पाळी !
वस्तुवस्तूवर घालुनिया धाड
करित घटकेतच झोपडे उजाड
स्तब्ध बाजूला बसे घरधनीण
लाल डोळ्यातिल आटले उधाण
भुके अर्भक अन् कवळुनी उरास
पदर टाकुनि त्या घेइ पाजण्यास
ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी
थोर थैलीतिल वाजवीत नाणी
“आणि ही रे !” पुसतसे सावकार,
उडे हास्याचा चहुकडे विखार
 
- कुसुमाग्रज
 
*******************
कणा
ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी
 
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन
 
माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली
 
भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले
 
कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बान्धतो आहे चिखल गाळ काढतो आहे
 
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
 
मोडून पडला संसार तरि मोडला नाहि कणा
पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा.
 
- कुसुमाग्रज
 
*******************
कधी तुझ्यास्तव
कधी तुझ्यास्तव
मनांत भरते
मेघ पिणारे
चांदल नाते
दवांत जे घर
बांधुनि राही
पण ते नाही
प्रेम वगैरे!
 
तव शरीरातुन
कधी पेटती
लाल किरमिजी
हजार ज्योती
त्यात मिळाया
पतंग होतो
परी नसे तो
काम वगैरे!
 
कधी शिवालय
पांघरुनी तू
समोर येता
विरती हेतू
मनात उरते
मात्र समर्पण
मी नसतो पण
भक्त वगैरे!
 
रंगीत असले
धुके धराया
सार्थ शब्द हे
अपरे वाया
त्या पलिकडचा
एक जरासा
दिसे बरासा
फक्त वगैरे!
 
- कुसुमाग्रज
 
*******************
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही
 
माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
 
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही
 
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही
 
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही
 
 
- कुसुमाग्रज
 
*******************

सरणार कधी रण प्रभु तरी
सरणार कधी रण प्रभु तरी
हे कुठवर साहू घाव शिरी ?
 
दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरि ही छाती
अजून जळते आंतर-ज्योती
कसा सावरू देह परी ?
 
होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातुन
मिटण्या झाले अधीर लोचन
खड्ग गळाले भूमिवरी
 
पावन-खिंडित पाउल रोवुन
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतिचा अखेर ये क्षण
बोलवशिल का आता तरी ?
 
 
- कुसुमाग्रज
 
*******************
अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
 
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.
 
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
 
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
 
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
 
कुसुमाग्रज
 
*******************
अहि नकुल
ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !
 
कधी लवचिक पाते खड्‌गाचें लवलवते,
कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,
प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.
 
मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.
 
चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !
अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.
 
वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.
 
चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !
 
हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल
अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला ! आला देख, नकूल !
 
थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.
 
पडलीच उडी ! कि तडितेचा आघात
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !
 
रण काय भयानक-लोळे आग जळांत
आदळती, वळती, आवळती क्रोधांत,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !
 
क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात
वार्‍यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।
 
संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले कीटक भोती !
 
– कुसुमाग्रज
 
 
 
*******************

अन्यथा
 
तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा
आणि म्हणूनच
बेबलच्या सनातन मनोर्‍यामधे
जेव्हा नेति – अस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात,
तेव्हा –
केवळ कवीसाठी
तो करतो स्वत:चा सारांश
इंद्रियसुंदर स्वरुपात
सृष्टीतून उतरतो खाली,
रहस्यदुर्गाच्या उग्र सावल्यांतून
पहारे चुकवीत बाहेर निसटणार्‍या
कलंदर राजपुत्रासारखा,
आणि
कवीच्या संवादी हातात घालून
रागदरीतील महत्तम स्वरासारखा
भ्रमण करतो
अस्तित्वाच्या सर्व हद्दीपर्यंत
– अन्यथा
तुकारामांचा अभंग
संभवलाच नसता
 
-‘मुक्तायन’ कुसुमाग्रज
 
 
*******************
निवास
खुप खुप वर्षांपूर्वी
आकाशाशी
माझा करार झाला
आणि आकाशगंगेतील
ती छोटी तारका,
निळ्या पारख्या प्रकाशाचा,
पिसारा फुलवणारी,
माझ्या मालकीची झाली
तेव्हापासून
पृथ्वीवर जेव्हा
ज्वालामुखीच्या उद्रेकांनी,
उसालेली उद्यानं
दग्ध होतात
किंवा कोकीळांची कूजनं
बाकीच्या प्रपातात,
गोठून पडतात,
तेव्हा
माझा निवास
त्या तारकेवर असतो,
व्यवहारापुरत
मी येथे
वावरत असलो तरी
-‘मुक्तायन’ कुसुमाग्रज
 
 
*******************
सातवा
चमच्यांच्या स्टँडवर
सात चमचे होते
एक चमचा एक दिवशी
गहाळ झाला
उरलेल्या सहांच्या गळ्यातून
प्रथमच
अनावर हुंदका फुटला
‘ ती असती तर’ – ते उद्गारले,
तो हरवला नसता
मीही अनावरपणे
सातवा चमचा झालो
आणि त्याची रिकामी जागा घेउन
सहांच्या हुंदक्यात
सामील झालो – आणि
पुटपुटलो;
खरं आहे, मित्रांनो
ती असती तर
मी हरवलो नसतो.
 
-‘मुक्तायन’ कुसुमाग्रज
 
 
*******************
तेव्हा
 
पहाटेच्या काळोखी फांद्यातून
अवेळी जागलेल्या कोणाएका
कोकिळेने
भ्रमिष्टपणे
दिली भिरकावून आकाशावर
कोठल्या स्वप्नाच्या स्पंजात रुतणारी
चौधारी
पल्लेदार स्वरावळ
नंतर सारं स्तब्ध….
संगमरवरी स्तंभाला टेकून
उभी राहिलेली व्याधाची चांदणी
किंचित हसली,
आणि रुपेरी वस्त्राचे हेम
अलगद उचलून
उतरायला लागली पहिली पायरी
क्षितिजाच्या तळाकडे…..
तेव्हा चारही वाजले नव्हते
 
-‘मुक्तायन’ कुसुमाग्रज
 
 
 
*******************

मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
 
मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
“परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले?
 
तो आहे किंवा नाही कुणा न लागे ठाव
प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव
गवसे न किनारा, फिरे जरी दर्यात
शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव!”
 
स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
“तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!”
 
– कुसुमाग्रज
 
*******************
 
आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……
– कुसूमाग्रज