ज्येष्ठ साहित्यिक, संस्कृत वाड्मयाचे गाढे अभ्यासक, ज्ञानेश्वरीसह अनेक विषयांवर प्रभुत्व, 'वक्ता दससहेस्त्रेशु' आणि असे अनेक पैलू राम शेवाळकरांना होते. शेवाळकरांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला घरातले संस्कार कारणीभूत ठरले.
शेवाळकरांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे २ मार्च १९३१ मध्ये झाला. नागपूर विद्यापीठातून त्यांनी एम. ए. संस्कृत व मराठीत केले. पुढे शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर वाशिम, यवतमाळ, नांदेड येथून ते अखेर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे स्थिरावले. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात तब्बल २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले.
त्यांची साहित्यसेवा सुरू झालेली असताना त्यांच्यावर सरस्वतीचेही वरदान लाभले होते. ओघवती आणि ओजस्वी वाणी मिळाल्याने ते वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होऊ लागले. त्यांनी तब्बल साडेतीन हजाराहून अधिक व्याख्याने गेल्या चाळीस वर्षांत दिली. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी अफाट गर्दी होत असे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अगदी छोट्या गावापासून ते अगदी कोलकता, दिल्ली, गोवा, देवास ग्वाल्हेर, इंदूर, हैदराबाद या ठिकाणीही त्यांची व्याख्याने झाली आहेत.
गोव्यात १९९४ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे ही निवड बिनविरोध होती. साहित्य संमेलनाच्या तोपर्यंतच्या इतिहासात अध्यक्षपदी बिनविरोध निवड फक्त दोघांचीच झाली आहे. त्यात एक शेवाळकर होते. शेवाळकरांचे अजातशत्रुत्व स्पष्ट करायला आणि त्यांच्या ज्ञानतपस्वी प्रतिमेविषयीचा आदरही यातून व्यक्त होतो. उत्तर अमेरिकेतील बृहनमहाराष्ट्र मंडळातर्फे झालेल्या आठव्या संमेलनात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते.
शेवाळकरांनी तब्बल ४८ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत. पुरस्कारांची संख्याही मोजण्यापलीकडे गेली आहे. शेवाळकर साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश निर्मिती महामंडळाच े सदस्य होते. शिवाय सेन्सॉर बोर्डाचेही ते ११ वर्षे सदस्य होते. साहित्य अकादमीवरही ते होते. विदर्भ साहित्य संघाचे ते नऊ वर्षे अध्यक्ष होते.
ह्रदयनाथ मंगेशकरांसोबत त्यांनी अमृताचा घनु ही ध्वनिफित केली. यात ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचे निरूपण त्यांनी केले. या ओव्या लता मंगेशकरांनी गायल्या आहेत. महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चित्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधीसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तीयोग भाग १ आणि २ या काही ध्वनिफिती आहेत.
आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या 'आचार्यकुल'चे ते सहसंस्थापक होते. याशिवाय अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांशी ते निगडित होते.
राम शेवाळकर यांची पुस्तके
कवितासंग्रहः असोशी, रेघा, अंगारा
व्यक्तीवेधः उजेडाची झाडे, देवाचे दिवे, प्रवास आणि सहवास, प्रसन्नतेचा मूक कटाक्ष, दर्शन विनोबांचे, मोरपीस, वर्तुळ आणि क्षितीज, भावबंध
चरित्रेः महर्षी विनोबा, साम्ययोगी विनोबा
ललितः अमृतझरी, पूर्वेची प्रभा, तारकांचे गाणे, रामसेतू, माणिकाच्या वाती, आकार आणि सुवास, संवादाचा सुवावू,