अण्णा जोशी तालुक्यात हायर सेकंडरी शाळेमध्ये मास्तर होते. शाळेमध्ये अण्णा मास्तर म्हणूनच प्रसिद्ध होते. घरी आजारी बायको, लग्नाच्या वयाला आलेली मोठी मुलगी व शिक्षणात लक्ष नसलेले व उनाडक्या करणारी दोन पोरं. हा त्यांचा संसार होता. आठ हजाराच्या पगारामध्ये प्रॉव्हिडंड फंड इन्शूरन्स व इतर रिकव्हरी झाल्यानंतर त्याच्या हातात एकंदर साडेचार हजार रुपयेच यायचे. इतक्या कमी पगारामध्ये या संसाराचा खटला कसा चालणार या चिंतेत मास्तर सतत राहायचे.
यावर उपाय म्हणूनच ते मुलांना खासगी क्लास लावायला सुचवायचे. शाळेमध्ये सगळ्याच गोष्टी समजावून सांगता येत नाही. त्यासाठी शांतचित्त व भरपूर वेळ हवा असतो. म्हणूनच प्रायव्हेट ट्यूशन करणे गरजेचे आहे. अण्णा मास्तर मुलांना ट्यूशनसाठी अप्रत्यक्ष दबावच टाकत होते. प्रसंगी मुलांच्या सारख्या चुका काढून ते हा दबाव वाढवायचे. पण मास्तराच्या सांगण्याकडे टारगट मुलं लक्षच देत नव्हती. आपलं कसं होणार या चिंतेत सतत राहणार्या अण्णा मास्तरांच्या तल्लख डोक्यामध्ये एक दिवशी एक कल्पना आली आणि काही दिवसाने प्रत्येक गुरुवारी त्यांच्या अंगामध्ये एका 'बाबा' ची स्वारी येऊ लागली. गुरुवारी संध्याकाळी अण्णा मास्तराचं रूप फारच विक्राळ असायचं. ते नाचायचे, उड्या मारायचे. लोकं त्यांना नमस्कार करायचे. त्याचे पाया पडायचे, व प्रश्न विचारायचे, अण्णा मनात येईल ते उत्तर द्यायचे. कुणाला म्हणायचे पाच गुरुवार कर तर कुणाला अकरा किंवा एकवीस गुरुवार. दर्शनाला येणार्यांना मास्तर म्हणायचे, 'मला काही नको. इथे बाबाच्या पेटीकडे लक्ष ठेवा'.
नशिबाने ज्यांचे काम व्हायचे ते अण्णा मास्तरांची कृपा झाली असे समजायचे. त्यांच्यामुळे अण्णा मास्तर आता अण्णा महाराज झाले. त्यामुळे दानपेटी आता भरून जाऊ लागली. ज्याचं काम नाही व्हायचं ते परत अण्णा महाराजाच्या दरबारात येत नव्हते. पण तरीही त्यांची लोकप्रियता वाढीला लागली. अण्णा महाराजांच प्रस्थ बरंच वाढलं होतं. त्यांना भेटणार्या लोकांमध्ये आमदार, खासदार, मंत्री यांचा समावेश होता. त्याच्या प्रापर्टीचा पसारा फारच वाढला होता. त्याकरिता आश्रमामध्ये बराच कर्मचारी वर्ग ठेवावा लागला. पण हा आश्रम धर्माच्या नावाखाली सरकारी जमिनीवर कब्जा केलेल्या जागेवर होता. आश्रमामध्ये जे दान यायचं त्यालाही इन्कम टॅक्सवर सूट होती. त्यांच्या आजारी बायकोची ट्रीटमेंट सरकारी खर्चाने व्ही.आय.पी. हॉस्पिटलामध्ये होत होती. दोन्ही मुलांना चांगला पगाराच्या सरकारी नोकर्या लागल्या. त्यांच्या मुलीचे लग्नही एका मंत्र्याच्या मुलाशी ठरले होते.
अण्णा महाराजांचा बँक बॅलेन्सही बराच वाढला. म्हणूनच. त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन टाकला होता. आता त्यांच्या अंगामध्ये 'बाबा'ची स्वारी येणं पण बंद झालं. कारण रोज लोकांच्या प्रश्नांचे उत्तर देऊन ते कंटाळले होते. आता त्यांना निवांत आरामाची इच्छा होती, म्हणून त्यांनी नोकरीही सोडली होती. बुवाबाजीपण बंद केली. आता भरपूर पैसा असल्यामुळे त्यांना दोन्ही गोष्टींची गरज नव्हती.