एकदा एका राजाने लोकशाही अवलंबली होती. कोणताही प्रश्न लोकशाहीच्या माध्यमाने सोडविण्यावर त्याचा भर होता. आपले राज्य अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे यासाठी त्याने राजवाड्यासमोर एक भला मोठा साखळदांड टांगला व सार्या राज्यात दवंडी पिटवली, कोणाला काही अडचण असेल, त्याने राजवाड्यासमोर टांगलेला साखळदांड ओढावा. राजा स्वत: त्याला मदत करेल...'
एके दिवशी अत्यंत गरीब, भुकेने व्याकूळ असा म्हातारा लंगडत- लंगडत राजवाड्यासमोर आला. त्याने मोठ्या कष्टाने तो भला मोठा साखळदांड ओढला. काही वेळातच राजा सज्जात आला व म्हणाला,' तुला काय मदत पाहिजे?'
म्हातारा बोलला-'राजा तुझ्या राज्यात मीच काय तर माझ्या सारखे शेकडो नागरिक अन्नापासून वंचित आहेत. गेल्या अनेक दिवसापासून माझ्या पोटात एक अन्नाचा कणही गेलेला नाही. मला खूप भूक लागली आहे. मला अन्न दे!'
राजाला त्या गरीब म्हातार्याची दया आली. तो त्याला सहानुभूतीपूर्वक म्हणाला, ' बाबा, तुझे दु:ख पाहून मला खूप वाईट वाटले. तुझ्या सारख्या अनेक गरीब नागरिकाच्या उपासमारी संदर्भात मी आजच एक उपसमिती नेमतो. परंतु तुला माझी एकच विनंती आहे की, या उपसमितीचे काम होईपर्यंत तू प्राण सोडू नकोस.'
राजाची प्रश्न सोडविण्याची ही लोकशाही पद्धत पाहून गरीब म्हातारा चांगलाच हतबल झाला व गुमान आल्या पावली परतला.