शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (07:39 IST)

माझी स्वाक्षरी असलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवेन- परमबीर सिंग

मुंबईतील हॉटेल्स आणि बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे टार्गेट दिलं असल्याचंही पत्रात म्हटलं होतं. याशिवाय, असे अनेक खळबळजनक आरोप यापत्रात करण्यात आले होते. मात्र, या पत्रात परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नसल्याने या पत्राच्या सत्येबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. मात्र, यावर परमबीर सिंग यांनी खुलासा केला आहे.
 
परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ई-मेलवर पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ई-मेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ई-मेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं होतं. त्यामुळं परमबीर सिंह यांच्या या पत्रावर शंका उपस्थित करण्यात येत होती. आता परमबीर सिंह यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
 
परमबीर सिंह यांच्यांशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलणं टाळलं. मात्र, मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र आपणच लिहलं असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. तसंच, लवकरच स्वाक्षरी असलेल्या पत्राची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, पत्रात आपण सर्व नमूद केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
परमबीर यांच्या लेटरबॉम्बने खळबळ
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्फोटक पत्र  समोर आल्याने राजकीय वर्तुळात तसेच महाराष्ट्र पोलीस दलात भूकंप झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले. देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, यासह अनेक गंभीर आरोप परमबीर यांनी या पत्रात केले. त्यानंतर देशमुख यांनी परमबीर यांचे सर्व आरोप फेटाळत हे षडयंत्र असल्याचा दावा केला व याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी स्वत: मुख्यमंत्र्यांना विनंती केली. या सर्व घटनाक्रमात जे पत्र व्हायरल झाले त्यावर परमबीर यांची स्वाक्षरीच नसल्याचे समोर आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.