बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 एप्रिल 2022 (10:05 IST)

दिल्लीत हनुमान जन्मोत्सवादरम्यान शोभायात्रेत दगडफेक, पोलिसांसह अनेक जण जखमी

दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जन्मोत्सव निमित्त मिरवणूक काढताना दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली आहे. यावेळी जोरदार दगडफेकही करण्यात आली. या घटनेत पोलिसांसह अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या गोंधळात अनेक वाहनांची तोडफोडही झाली आहे. जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेदरम्यान कथित दगडफेक झाली आणि त्यानंतर जमाव हिंसक झाला.

जखमींना जहांगीरपुरी येथील बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलीस परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन करून चोरट्यांचा शोध घेत आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीसच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश शहा यांनी दिले आहेत.
 
यासोबतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरही पोलिस लक्ष ठेवून आहेत. हा पूर्वनियोजित षडयंत्र आहे का, अचानक अशी घटना घडली तर त्यामागची कारणे काय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांची पथके जमली आहेत. गृहमंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोबतच अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिल्ली पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे. सर्वत्र बळ वाढवण्यात आले आहे. गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
 
दरम्यान भाजपनेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, दिल्लीतील जहागीरपुरी येथे हनुमान जन्मोत्सवावर दगडफेक करणे हे दहशतवादी कृत्य आहे. बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त आता भारतातील नागरिकांवर हल्ले करण्याचे धाडस करत आहे. आता त्यांचे प्रत्येक कागद पत्रे तपासून घुसखोरांना देशातून हद्दपार करणे गरजेचे आहे.
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, "नागरिकांना मी शांततेचं आवाहन करतो. शांततेचं पालन करणं आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. त्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही. केंद्र सरकारने दिल्लीत शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावा".
 
ते पुढे म्हणाले, "जहांगीरपुरी परिसरात शोभायात्रेदरम्यान सहभागी लोकांवर दगडफेक ही घटना अतिशय निंदनीय आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे".
 
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रसिद्ध केलं संयुक्त निवेदन
दरम्यान देशभरातील धार्मिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासंदर्भात शनिवारी सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या 13 नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं आहे.
 
संयुक्त निवेदन देणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे डी.राजा, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे महासचिव देवव्रत विश्वास, आययूएमएलचे महासचिव पी.के. कुन्हालीकुट्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांचा समावेश आहे.
 
लोकांनी शांततेचं पालन करावं असं आवाहन या नेत्यांनी केलं आहे. तेढ पसरवून शांततेचं भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी असं आवाहन या नेत्यांनी केलं आहे.