1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (17:06 IST)

पासपोर्ट काढणे झाले सोपे, नियमांमध्ये झाला बदल

काही दिवसांपासून परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये काही दिलासादायक बदल केले आहेत. यात आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

नव्या नियमांनुसार  आता कोणतीही स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जन्म-मृत्यू रजिस्ट्रार किंवा संबंधित प्राधिकरणाने नोंद केलेली जन्म तारीख वैध धरण्यात येईल. याशिवाय मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेला शाळेचा दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय पॅन कार्डचाही वापर करता येणार आहे, आधार किंवा इ-आधारच्या मदतीने अर्ज करता येईल, वाहन परवाना आणि मतदान कार्ड यांसारखे ओळखपत्र वैध ठरणार आहे. 
 
नव्या नियमांनुसार, पासपोर्टच्या अर्जामध्ये आई किंवा वडिलांचं नाव देणं अनिवार्य नाही. अर्जदार आता कायदेशीर पालकाचं नाव देऊ शकतो. या नियमामुळे सिंगल पॅरेंट किंवा अनाथ व्यक्तींना दिलासा मिळेल. याशिवाय साधू किंवा संन्यासी त्यांच्या आध्यात्मिक गुरुचं नाव देऊ शकतात.

सोबतच कॉलमची संख्या घटवून ती 15 वरुन 9 करण्यात आली आहे. यामध्ये A, C, D, E, J आणि K कॉलम हटवण्यात आले आहेत. आता अर्जदार एका साध्या कागदावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देऊ शकतो. विवाह प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. याशिवाय घटस्फोटित व्यक्तींना पती किंवा पत्नीचं नाव देण्याची गरज नाही.