शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (13:50 IST)

राहुल गांधी लखीमपूरकडे रवाना, प्रियांकांनाही जाण्याची परवानगी

राहुल गांधी, प्रियांका गांधींसह तीन इतर जणांना लखीमपूर खिरीमध्ये जायची परवानगी देण्यात आल्याचं उत्तर प्रदेश सरकारच्या गृह मंत्रालयाने म्हटलंय.
 
लखीमपूर खिरीमध्ये 3 ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचारामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी इथे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
 
सरकारला शेतकऱ्यांच्या ताकदीचा अंदाज नसल्याचं राहुल गांधींनी लखीमपूरला जाण्याआधी म्हटलंय.
 
दरम्यान उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी जिल्ह्यात गृह राज्यमंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्यांवर जीप चढवल्या प्रकरणी तिकोनिया पोलिस ठाण्यात, मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रासह 15-20 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा हत्या, गुन्हेगारी कट आणि इतर गंभीर कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र एफआयआरमध्ये त्यांचं नाव नाही.
 
पोलिसांनी 147,148,149,279,338,304 A,302,आणि 120 B या कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. शेतकऱ्यांच्या वतीनं जगजित सिंह यांनी तक्रार दाखल केली. दरम्यान, लखीमपूर खिरी जिल्हा आणि जवळच्या पिलीभीत, बहराइच, सीतापूर आणि शाहजहाँपूर याठिकाणच्या इंटरनेट सेवा सरकारच्या आदेशावरून बंद करण्यात आल्या आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि त्यांचा मुलगा आशिष बुधवारी रात्री बनवीरपूर या मूळ गावी परतले आहेत.
आशिष पोलिसांना शरण जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहेत. मात्र मंत्री किंवा पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
 
लखीमपूरला जायला निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींना ताब्यात घेण्यात आलं होतं.
 
"सीतापूरच्या डीएसपी पियुष कुमार सिंग यांनी तोंडी सांगून कलम 151 अंतर्गत मला इथं अटक करून ठेवलीय. 4 ऑक्टोबरच्या सकाळी साडेचार वाजल्यापासून मी अटकेत आहे," असं काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींनी सांगितलं होतं.
 
प्रियंका गांधी यांनी पत्रक काढून 4 ऑक्टोबरच्या दिवसभरात काय घडलं, याची माहिती दिली.
 
"कलम 144 लखीमपूर खिरी इथं लागू करण्यात आलंय. सीतापूरपासून ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. सीतापूरमध्ये कलम 144 लागू नाहीय," असंही प्रियंका गांधी यांनी सांगितलं.
 
तसंच, पोलीस प्रशासन आपल्याशी आणि आपल्या सहकाऱ्यांशी कसं वागलं, याचा वृत्तांतही प्रियंका गांधी यांनी या पत्रकातून मांडला आहे.