शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (12:12 IST)

लखीमपूर खिरीमध्ये जाण्यापासून प्रियांका गांधींना रोखलं, अटक झाल्याचा काँग्रेसचा दावा

लखीमपूर खिरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी आयजी लखनऊ रेंज लक्ष्मी सिंह यांच्याबरोबर 45 मिनिटं चर्चा केली. यावेळी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही उपस्थित होते.
 
लवकरच याप्रकरणी तोडगा निघेल आणि निदर्शनं संपुष्टात येतील, असं माध्यमांशी बोलताना लक्ष्मी सिंह यांनी सांगितलं.
 
शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर 4 मागण्या ठेवल्या आहेत. यात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांची हकालपट्टी करावी, त्यांच्या मुलाला अटक करावी, पीडितांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी आणि सरकारी नोकरी द्यावी, या मागण्या आहेत.
 
या मागण्यांव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर इतरही काही मागण्या केल्या आहेत.
या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 
अजय मिश्र टेनी यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
 
तर टेनी यांनी म्हटलंय की, या घटनेत माझा मुलगा सहभागी नव्हता, त्याची कार तेवढी घटनास्थळी होती. या घटनेत आमच्या कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला आहे.
 
टेनी यांनी रात्री उशीरा ट्वीट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा रात्री उशीरा लखीमपूर खिरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघाल्या होत्या.
 
पण यूपी प्रशासनानं त्यांना तिथं जाण्यापासून रोखल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
 
"शेतकऱ्यांना नेस्तनाभूत करण्याचं राजकारण हे सरकार करत असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे, हा शेतकऱ्यांचा देश आहे भाजपचा नाही. पीडित शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटून मी कुठलाही गुन्हा करत नाहीये. तुम्ही मला का थांबवत आहात, तुमच्याकडे वॉरंट आहे का," असा सवाल प्रियांका गांधी वाड्रा यांनी विचारला आहे.
 
तर दुसराकडे प्रियांका यांना हरगाव जवळ अटक करण्यात आल्याचं यूथ काँग्रेसचे अध्यक्षचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी ट्वीट करून म्हटलंय.
हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा रानटी प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.या घटनेचा मी निषेध करतो, असंही त्यांनी ट्वीट करून म्हटलंय.
 
लखीमपूर खिरीमध्ये रविवारी काय घडलं होतं?
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथे शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारादरम्यान पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बीबीसीचे प्रतिनिधी समीरात्मज मिश्र यांनी ही माहिती दिली आहे.
दोन लोकांचा मृत्यू गाडीने उडवल्यामुळे तर तीन लोकांचा मृत्यू गाडी उलटल्यामुळे झाला असल्याचं लखीमपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अरविंद चौरसिया यांनी बीबीसीचे प्रतिनिधी समीरात्मज मिश्र यांच्याशी बोलताना सांगितलं.
 
गेल्या वर्षी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून हजारो शेतकरी काळे झेंडे घेऊन तिकुनिया जिल्ह्यातील लखीमपूर खिरी इथे जमले होते.
जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे या भागात आले होते. अजय मिश्रा यांच्या टेनी गावातील कार्यक्रमासाठी त्यांना जायचं होतं.
 
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या गाड्यांचा ताफा आंदोलनस्थळी आला.
 
ताफ्यातील काही गाड्या आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर घालण्यात आल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. यामध्ये एकूण 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत.
 
गाड्यांचा ताफा सुरळीतपणे मार्गस्थ व्हावा यासाठी शेतकरी आंदोलकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहण्यास सांगण्यात आलं होतं. किसान मोर्चाने जारी केलेल्या पत्रकानुसार, या घटनेत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर संघटनेचे नेते ताजिंदर सिंग विर्क गंभीररीत्या दुखापतग्रस्त झाले आहेत.
 
या घटनेनंतर परिसरात वातावरण तापलं आणि वाहनांना आग लावल्याचे प्रकार झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
तिकोनियात नेमकं काय घडलं?
तिकोनियात भाजप समर्थकाच्या गाडीने काही शेतकरी जखमी झाले. यानंतर भडकलेल्या शेतकरी आंदोलकांनी गाड्यांना आग लावली.
 
स्थिती तणावपूर्ण झाल्याने उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम थांबवण्यात आला. परिस्थिती लक्षात घेऊन, प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
भारतीय किसान युनियनने आरोप केला आहे की तीन शेतकऱ्यांना गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाच्या गाडीने उडवलं.
 
शेतकऱ्यांचे नेते डॉ. दर्शनपाल यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "तिकोनियात उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरपर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी हेलिपॅडला घेराव घालण्यात आला. हा कार्यक्रम संपतच होता, लोक तिथून परतत होते.
 
त्याचवेळी तीन गाड्या वेगाने आल्या. ज्यामध्ये अजय मिश्रा, त्यांचा मुलगा, भाऊ आणि भावाचे काका बसले होते. त्यांच्या गाड्या शेतकऱ्यांच्या अंगावर गेल्या. एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. एकाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला".
 
बीकेयूचे नेता राकेश टिकैत लखीमपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, "कृषी कायद्यांचा शांततापूर्ण निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय गृहराज्यमंत्राच्या गाड्यांचा ताफा घालणं अमानुष आणि क्रूर आहे. उत्तर प्रदेशातील दांभिक भाजपाचा जुलूम आता सहन केला जाणार नाही. असंच सुरू राहिलं तर उत्तर प्रदेशात भाजप नेते गाडीने फिरू शकणार नाहीत, आणि त्यातून उतरूही शकणार नाहीत".
 
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही याघटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
"भाजप देशातील शेतकऱ्यांचा एवढा द्वेष का करतं? त्यांना जगण्याचा हक्क नाहीये का? त्यांनी एखाद्या गोष्टीविरोधात आवाज उठवला तर त्यांना गोळी मारली जाते, गाड्या अंगावर घातल्या जातात. खूप झालं. हा शेतकऱ्यांचा देश आहे. भाजपच्या क्रूर विचारधारेची जहागीर नाही", असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.
"हा अमानवीय नरसंहार पाहूनही जे गप्प आहेत ते आधीच मृत झाले आहेत. पण आम्ही हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. शेतकरी सत्याग्रह जिंदाबाद", असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे की, "शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी शांतता पाळावी. विजय शेतकऱ्यांचाच होईल. सरकारला शुद्ध आली नाही तर भाजपच्या एकाही नेत्याला घरातून बाहेर पडू दिलं जाणार नाही".