आळंदीत अडकलेल्या भाविकांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या भीषण पूरपरिस्थितीत शहरातील विविध सखल भागांत अडकून पडलेल्या तब्बल ४०८ भाविक आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.
हे बचावकार्य आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, स्थानिक अग्निशमन दल, आणि एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर राबविले.
इंद्रायणी नदीला पूर आल्याने पाणी शहरात आणि मंदिरात शिरल्यामुळे भाविकांची धांदल उडाली. परिस्थितीवर नियंत्रण मिवण्यासाठी सर्व यंत्रणांनी अहोरात्र मोहीम राबवून ४०८ भाविकांची विविध भागातून सुखरूप सुटका केली. अनेक नागरिकांना शोधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
सध्या आळंदीतील पूरग्रस्त भागात प्रशासनामार्फत मदत आणि आपत्कालीन सेवा अविरतपणे सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारी स्वतः जागेवर उपस्थित राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सद्यस्थिती पाहता नागरिकांनी आणि भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच सर्वांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आणीबाणीच्या प्रसंगी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit
