शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 9 जून 2021 (09:57 IST)

उरवडे आग प्रकरण; कंपनीचा मालक निकुंज शहाला अटक

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या उरवडे गावाजवळील केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला. या आग दुर्घटना प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी कंपनीचा मालक निकुंज शहा याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
 
उरवडे आग दुर्घटना प्रकरणाचा चौकशी रिपोर्ट जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. बेकायदा अतिरिक्त ज्वलनशील पदार्थांचा साठा करणे, कर्मचाऱ्यांच्या ईएसआयएस अंतर्गत नोंदी नसणे, फायर सेफ्टी नियम अर्थात अग्निसुरक्षा शर्थींच उल्लंघन करण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. यासोबतच २०१६ ते २०२० प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगी शिवाय रासायनिक प्रक्रिया उद्योग चालवणे, पीएमआरडीएच्या परवानगी शिवाय कंपनीच्या मूळ बांधकामात बदल केल्याचंही म्हटलं आहे. अहवालात म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांना स्वयंचलित दरवाजा स्फोटाच्या प्रेशरने बंद झाल्यानंतर बाहेर पडणं अशक्य झाल्याने कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला.
 
उरवडे येथील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत एकूण १८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी लागलेली ही आग अवघ्या काही क्षणातच झपाट्याने पसरली. या आगीत होरपळून मृत्यू झाल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण आहे त्यामुळे डीएनए टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १७ जणांची नावे समोर आली आहेत.