शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (15:39 IST)

खड्ड्यांवरुन भुजबळ संतप्त; १ नोव्हेंबरपासून टोल बंद पाडण्याचा इशारा

chagan bhujbal
नाशिक – नाशिक-मुंबई महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे संतप्त झाले आहेत. या महामार्गावर प्रचंड खड्डे असून त्याचा मोठा त्रास वाहनधारक आणि प्रवशांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार मागणी करण्यात येत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आता याची दखल भुजबळांनी घेतली असून त्यांनी आता थेट इशाराच दिला आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद पाडणार असल्याचे भुजबळांनी सांगितले आहे.
 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळ यांनी आज सकाळीच नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली. फारसे खड्डे नसल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात होता. मात्र, भुजबळांनी महामार्ग प्राधिकरणाच्याअधिकाऱ्यांना नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे दाखवून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. खड्ड्यांमुळेच गंभीर अपघात होत असल्याची बाबही भुजबळांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शिवाय खड्ड्यांमुळे वेळ, पैसा, इंधन यांच्या अपव्ययाबरोबरच जिवीत हानी होत आहे. प्राधिकरणाच्यावतीने संबंधित कंत्राटदाराकडून कामे करुन घेत नसल्याने भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता याप्रश्नी ११ दिवसांची मुदत खड्डे बुजविण्यास देण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर हे सर्व खड्डे बुजवावेत जेणेकरुन गावी जाणाऱ्या किंवा येणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही. हे काम पूर्ण झाले नाही तर १ नोव्हेंबरपासून या महामार्गावरील सर्व टोल बंद पाडण्यात येतील, असा इशाराच भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
 
३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा सज्जड दम त्यांनी दिला.
 
छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडनी करत फैलावर घेतले. यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंखे, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इंफ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
 
मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास १ नोव्हेंबर पासून टोल बंद करण्याचा दिला.
Edited By - Ratandeep Ranshoor