शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (08:31 IST)

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्यांना (GT) पुन्हा एकदा मुदतवाढ

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दैनंदिन रुग्णांची संख्या 6-7 हजाराच्या दरम्यान आहे. त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हे लक्षात घेता राज्य सरकारने 9 जुलै रोजी शासन निर्णय जारी करुन 15 टक्के शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या 14 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता राज्य सरकारने हा निर्णय रद्द करुन शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांना मुदतवाढ दिली आहे.तसेच बदल्यांची मर्यादा 15 टक्क्यांवरुन 25 टक्के केली आहे.
 
राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या केल्या जातात. परंतु, सद्यस्थितीत राज्यात कोविड-19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नसल्याने आणि तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता बदल्यांसंदर्भात निर्णय घेतला होता.
त्यानुसार 2021-22 या चालू आर्थिक वर्षात 15 टक्के बदल्या 14 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्यात याव्यात असे आदेश 9 जुलै 2021 रोजी देण्यात आले होते.या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने नव्याने आदेश काढले आहेत.
 
यामध्ये म्हटले आहे की, कोविड मुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे.त्यामुळे बदली भत्यावर खर्च मर्यादित स्वरूपात करण्याच्या दृष्टीने सर्वसाधरण बदल्या एकूण कार्यरत पदांच्या 25 टक्के एवढ्या मर्यादेत करण्यात याव्यात.25 टक्के मर्यादेत सर्वसाधारण बदल्या करत असताना संबंधित पदावर विहित कालावधीत पूर्ण झालेल्या सर्व पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी ज्यांचा संबंधित पदावरील जास्त कालावधी पूर्ण झाला आहे,
अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्राधान्याने बदली करावी. बदल्यांच्या संदर्भातील सर्व कार्यवाही ही 9 ऑगस्ट 2021 पर्यंत पूर्ण करण्यात यावी.जी पदे रिक्त राहतील केवळ अशा रिक्त पदांवर विशेष कारणास्तव बदल्या (10 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या कालावधीत पूर्ण कराव्यात.

सर्वसाधरण बदल्या तसेच विशेष कारणास्तव बदल्या करताना नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी प्राप्त करण्याची व बदली अधिनियमातील सर्व तरतुदींचे पालन करण्याची दक्षता घ्यावी.ज्या विभागांमध्ये बदलीची कार्यवाही करण्यासाठी संगणकीय प्रणाली \पुर्णत: किंवा अंशत: विकसित केली आहे,अशा विभागांनी या प्रणालीचा वापर करावा,असे शासन आदेशात म्हटले आहे.