गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 जुलै 2021 (10:43 IST)

करून भागले आणि लोकसंख्या नियंत्रणाला लागले; संजय राऊत यांचा भाजपला टोला

लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणत आहे. जात, धर्म, राजकारणापलीकडे याकडे पाहायला हवं. भारताच्या लोकसंख्येची स्थिती विस्फोटक अशी आहे. लोकसंख्या नियंत्रणाचा शुद्ध हेतू काय? शिक्षण,आरोग्य याबाबत व्यवस्था निर्माण करण्यात सरकार अपुरे पडले.आता करून भागले आणि लोकसंख्या नियंत्रणाला लागले असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
 
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूआहे.उत्तर प्रदेशात शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर शिक्षकांनी आंदोलन केलं. त्या शिक्षकांवर लाठीमार केला.लोकसंख्येच्या स्फोटातून महागाईपासून ते बेरोजगारीचं अराजक निर्माण झालं आहे.
 
मुसलमानांची लोकसंख्या वाढते आहे म्हणून हिंदूंनी कुटुंबनियोजन करू नये, चार-पाच मुलांना जन्म द्यावा असा महान विचार मांडणारे हिंदुत्ववादीच आता लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणत आहेत.अन्न-वस्त्र-निवारा यासारख्या मूलभूत गरजा नागरिकांना पुरवण्यात सरकार कमी पडलं.लोकसंख्येची काळजी घेतली असती तर याच लोकसंख्येने देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं असतं.
 
योगी महाराजांनी उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणला तर भाजपचे 160 आमदार बाद होतील. कारण या आमदारांना दोनपेक्षा जास्त अपत्यं आहेत.खासदार रवी किशन लोकसभेत लोकसंख्या नियंत्रणाचे खासगी विधेयक मांडणार आहेत. त्यांना स्वत:ला चार अपत्ये आहेत.