शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (08:56 IST)

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसून,कोरड्या हवामानाची स्थिती

दिवाळीच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. मात्र, त्याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसून, राज्यात या काळात बहुतांश भागात कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात देशातील हे पहिले चक्रीवादळ असून, त्याचा फटका पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील पावसाळी स्थिती सध्या निवळत असून, मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला वेग मिळत आहे.
 
अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस होतो आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, येत्या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागामध्ये पावसाळी स्थिती दूर होऊन कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. पुढील एक-दोन दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत काही भागांतच पावसाची शक्यता आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor