1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (15:32 IST)

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतरचा ड्रामा, अजित पवारांनी म्हटलं, 'सुप्रिया, तू बोलू नकोस'

ajit pawar
'मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे,' असं म्हणत शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली.
 
'लोक माझा सांगाती' या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. नवा अध्यक्ष कोण होणार हे पक्षातील वरिष्ठांनी ठरवावं असंही पवारांनी सांगितलं.
 
गेले काही दिवस राजकीय वर्तुळात अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चर्चा होत असल्याचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली.
 
शरद पवार यांच्या या घोषणेनंतर व्यासपीठावर उपस्थित नेते, तसंच कार्यकर्त्यांमध्ये एकच चलबिचल झाली.
 
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तसंच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पदावरून पायउतार न होण्याचं आवाहन केलं.
 
मात्र, त्याचवेळी अजित पवार यांनी शरद पवार आपली भूमिका बदलणार नसल्याचं ठामपणे सांगितलं.
 
'साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष घडला तर तुम्हाला का नको?'
दरम्यान, शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार घेण्याचा निर्णय घेतला, याचा अर्थ ते पक्षातून बाहेर पडणार असा होणार नाही. त्यांनी निर्णय घेतला आहे, ते तो बदलणार नाहीत. भावनिक होऊ नका, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला आपलं समर्थन दिलं.
 
कार्यकर्त्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केला होता. पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. त्याच गोंधळात सगळ्यांच्या भाषणांनंतर अजित पवार बोलायला उभे राहिले.
 
सर्वांत शेवटी अजित पवार यांनी बोलायला सुरूवात केली. पवार राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.
 
पार्टीचा जो अध्यक्ष होईल, तो पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल. साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, आपला सगळा परिवार असाच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, असं अजित पवार यांनी म्हटलं.
 
अजित पवार यांनी पुढे म्हटलं की, शरद पवार यांनी परवाच म्हटलं होतं की, भाकरी फिरवायची असते. तुम्ही म्हणत आहात की, तुमच्यापासून सुरुवात नको. पण त्यांनी निर्णय घेतला. मी काकींशी बोललो, त्यांनीही म्हटलं की, ते निर्णय बदलणार नाहीत.
 
“साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष शिकत जाईल. आपण त्याला साथ देऊ. आपण जसं आपल्या घरामध्ये वय झाल्यानंतर नवीन लोकांना शिकवत असतो, घडवत असतो. तशा पद्धतीने गोष्टी घडू दे ना. तुम्ही कशाला काळजी करता.”
 
‘काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यांदेखत नवीन अध्यक्ष तयार झाला, तर तुम्हाला का नको रे?’ असा सवाल अजित पवार यांनी केला.
 
काँग्रेसचं उदाहरण काय देता, काँग्रेसच्या चुकीच्या निर्णयामुळेच आज देशात त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असं म्हणत कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोरचच अजित पवारांच्या वक्तव्याला विरोध केला.
 
कार्यकर्त्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांना बोलण्याचा आग्रह केला. मात्र अजित पवार यांनी माइक घेत ‘सुप्रिया, तू बोलू नकोस,’ असं थेट सांगितलं. तिचा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीनं सांगतोय, असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना गप्प राहायला सांगितलं.
 
मात्र काही कार्यकर्त्यांनी आपल्याला दादांचा निर्णय मान्य नसल्याचं म्हटलं.
कार्यकर्ते शरद पवारांचं नाव घेऊन घोषणा घेतानाही दिसले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.
 
"तुम्ही पक्षाचे नेते आहात, तुम्हीच आमची कमिटी आहात. तुम्हाला असं बाजूला होता येणार नाही असं सांगत तुम्ही राजीनामा मागे घ्या", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
 
‘साहेबांना जेवू द्यायचं का नाही?’
अजित पवार यांनी सांगितल्यानंतरही कार्यकर्ते शांत बसायला तयार नव्हते. निर्णय मागे घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिकाच कार्यकर्त्यांनी घेतली.
 
तुम्ही अध्यक्ष राहा आणि कार्याध्यक्ष नेमू, असंही कार्यकर्त्यांनी म्हटलं.
 
प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी माइक घेऊन प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं, “तुम्ही सांगितलं आम्ही ऐकलं. आता साहेबांवर अधिक दबाव नरो, आम्ही पक्षातले वरिष्ठ लोक साहेबांसोबत चर्चा करतो. त्यांचं वय, प्रकृती पाहता त्यांना असा त्रास देणं योग्य आहे का? एवढ्या मोठ्या माणसाशी असं वागू नका, त्यांना जेवू द्यायचं का नाही?”
 
साहेबांना जाऊ द्या, अशी विनंती कार्यकर्त्यांना जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल यांनी केली.
 
मात्र, निर्णय मागे घेतल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
 
त्याचवेळी सर्वांची सहनशीलता आता संपलेली आहे, साहेबांना जाऊ द्या, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं.
 
अखेरीस शरद पवार बाहेर पडले. मात्र, त्यांच्या गाडीलाही कार्यकर्त्यांनी घेराव घातला.
 
या सगळ्या घडामोडींनंतर ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
 
निवृत्तीच्या भाषणात पवारांनी काय म्हटलं?
शरद पवार यांच्या निवृत्ती भाषणाची लिखित प्रत माध्यमांना देण्यात आली आहे. त्यात पवारांनी म्हटलंय -
 
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली 24 वर्ष राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 पासून सुरू झालेला हा संपूर्ण प्रवास गेली 63 वर्ष अविरत सुरू आहे. त्यापैकी 56 वर्ष मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करतो आहे.
 
संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील 3 वर्ष शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाअधिक लक्ष घालण्यावर भर असेल. याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही. सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे.
 
त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा मानस आहे. युवक, युवती आणि विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकुवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहील.
 
अध्यक्षपदाबाबत समिती
आपल्या भाषणात शरद पवारांनी असंही म्हटलं की, “रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठित करावी असं मी सुचवू इच्छितो.”
 
ते म्हणाले, “गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले हे मी विसरू शकत नाही. परंतु यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे.”
 
त्यांनी या समितीसाठी - प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के.शर्मा, पी.सी.चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसंच फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन – ही नावं सुचवली आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
Published By- Priya Dixit