शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (14:54 IST)

विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती;बोर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

heavy rain
गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. बोर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अमरावती जिल्‍ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पुन्‍हा एकदा जनजीवन विस्‍कळीत झाले असून वरूड तालुक्‍याला पुराचा मोठा फटका बसला आहे. वरूड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय सातनूर, गव्‍हाणकूंड, बहादा, शेंदूरजनाघाट येथे पूरस्थिती आहे. यामुळे गावक-यांना रात्र जागून काढावी लागली.
 
जुलै महिन्यात गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. यात शेतीसह रस्ते, घर आदींचे नुकसान झाले. कालपासून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मूलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड आदी मार्ग बंद झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील पोथरा नदी पुलावरून पाणी वाहत असून सावंगी-हेटी, हिंगणघाट- पिंपळगाव आदी मार्ग बंद झाले आहेत. पहाटे काही घरात पाणी शिरले. यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर अकोला जिल्ह्यात देखील रात्री मुसळधार पाऊस झाला.