मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (17:03 IST)

जितेंद्र आव्हाड यांना अटक, हर हर महादेव चित्रपटाला विरोध केल्यामुळे कारवाई

jitendra awhad
हर हर महादेव चित्रपटाला विरोध केल्याच्या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आलीय. आव्हाड यांनी स्वतः याची माहिती त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित ‘हर हर महादेव' या चित्रपटावर आता विविध संघटनांकडून आक्षेप घेतला जात आहे.
 
याच घटनाक्रमादरम्यान ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता.
 
नंतर या प्रकरणावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये उमटल्या. शिवाय संभाजीराजे छत्रपती यांनीही या चित्रपटाला एक पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शवला होता.
 
याच प्रकरणात पोलिसांकडून जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.
 
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असं ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो."
 
त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं.  “मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.
 
“हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही,” अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे.
 
आव्हाड यांच्या अटकेनंतर ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सरू केली आहे.
 
तर आम्ही छत्रपतींचा आपमान सहन करणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या अटकेवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय.
 
आव्हाडांना अटक त्यांच्या वैचारिक मतभेदांमुळे नाही तर थिएटरमध्ये लोकांना शिविगाळ आणि मारपिट केल्यामुळे झाल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय.
 
Published By- Priya Dixit