मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगतची जमीन खचली, पुतळयाला धोका
Maharashtra News: सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने बांधलेला भव्य पुतळ्याला धोका उत्पन्न झाला असून काही दिवसांपूर्वी उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या व्यासपीठाच्या काठावरील जमीन खचली आहे. त्यामुळे प्रतिमेच्या डाव्या भाजूस मोठी भेग पडली आहे. परिणामी, व्यासपीठाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
राजकोट किल्ल्यावर पूर्वी स्थापित केलेला महाराजांचा अंदाजे 40 फूट उंच पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यामुळे सरकारला बरीच टीका सहन करावी लागली. विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर, महायुती सरकारने पुन्हा पुतळ्याच्या जागी हातात तलवार घेऊन महाराजांचा 83 फूट उंच पुतळा बांधला आहे.
हा पुतळा 10 फूट उंच प्लॅटफॉर्मवर बसवण्यात आला आहे. मे2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. पण एका महिन्यातच पुतळ्याच्या प्लॅटफॉर्मची जमीन खचली आहे.
यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने घाईघाईने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुतळा सुरक्षित असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. पुतळ्याला कोणताही धोका नाही.असे प्रशासनाने म्हटले आहे.
सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील राजकोट किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्धा पोजमध्ये ६० फूट उंच पुतळा बसवण्यात आला आहे. तलवारीसह पुतळ्याची एकूण उंची 83 फूट आहे. तर 10 फूट उंच व्यासपीठामुळे जमिनीपासून पुतळ्याची एकूण उंची 93 फूट झाली आहे. पुतळ्याच्या बांधकामात कांस्य धातूचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 88% तांबे, 4% जस्त आणि 8% कथील आहे. पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिमी जाडी असलेले कांस्य वापरले गेले आहे.
या कामासाठी, DUPLEX स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क, स्टेनलेस स्टील SS 316 दर्जाचे रॉड यांसारखे गंजरोधक बांधकाम साहित्य वापरले गेले आहे. प्लॅटफॉर्मसाठी उच्च दर्जाचे काँक्रीट आणि स्टेनलेस रॉड वापरण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत आलेल्या फाययान, निसर्ग, टोकटे सारख्या चक्रीवादळांची तीव्रता लक्षात घेऊन नवीन पुतळा बांधण्यात आला आहे. पुतळा बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी दावा केला आहे की पुतळा 100 वर्षे सुरक्षित राहील. पुढील 10 वर्षे नियमित देखभाल आणि देखरेखीची जबाबदारी देखील कंत्राटदारावर आहे.सद्या सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज आहे. यामुळे पुतळ्यास कोणताही धोका नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली आहे
Edited By - Priya Dixit