1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2024 (08:53 IST)

रक्षा खडसेंना युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्रिपद; 23 व्या वर्षी सरपंच ते केंद्रात राज्यमंत्री

Raksha Khadse
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बहुमताचा आकडा पार केल्यानं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालंय.या नव्या सरकारचा शपथविधी 9 जून 2024 रोजी पार पडला. एकूण 71 जणांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
 
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांची मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली.
 
रक्षा खडसे महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री असतील. त्या सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.
 
राजकारणाची सुरुवात
रावेरमधले स्थानिक सांगतात की रक्षा खडसेंचा राजकारण प्रवेश लग्नानंतरच झाला. त्यांना त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी राजकारणात आणलं.
 
त्यांचं पहिलं राजकीय पद होतं ते मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी गावचं सरपंचपद. कोथळी हे खडसे कुटुंबाचं गाव आहे.
 
2010 साली त्या कोथळी गावच्या सरपंच झाल्या. तेव्हापासूनच त्या भाजपत सक्रीय आहेत.
 
यानंतर त्या 2010-2012 या काळात जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या आणि याच काळात त्या जिल्हा परिषद अध्यक्षही होत्या.
 
2014 साली त्यांना पहिल्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून तिकीट मिळालं.
 
मोठ्या मताधिक्याने विजय
रक्षा खडसे पहिल्यांदा संसदेत खासदार झाल्या तेव्हा त्या 26 वर्षांच्या होत्या.
 
2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनीष जैन यांचा जवळपास साडेतीन लाख मतांनी पराभव केला होता तर 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसचे उमेदवार उल्हास पाटील यांचा सव्वातीन लाख मतांनी पराभव केला होता.
 
गुर्जर पाटील-लेवा पाटील फॅक्टर
उत्तर महाराष्ट्रात ज्या दोन जागा राखण्यात भाजपला यश आले आहे, त्यापैकी एक जागा रावेरची आहे.
 
रावेर मतदार संघात लेवा-पाटील आणि गुर्जर-पाटील या जातींचं प्राबल्य आहे.
 
रक्षा खडसे स्वतः गुर्जर समुदायातून येतात तर त्यांचं सासर म्हणजे खडसे कुटुंब लेवा-पाटील समुदायातलं आहे.
 
रक्षा खडसेंच्या विरोधात त्यांचीच नणंद रोहिणी खडसेंना शरद पवार गटाकडून तिकीट दिलं जाईल अशी चर्चा होती.
 
पण शेवटी राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून मराठा समाजाच्या श्रीराम पाटील यांची उमेदवारी घोषित झाली.
 
त्यातच एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधून राजीनामा देत सुनेच्या प्रचाराची जबाबदारी हाती घेतली त्यामुळे या दोन्ही जातींची एकगठ्ठ मतं त्यांना मिळाल्याचं म्हटलं गेलं.
 
‘परतीचा धागा’
2024 ला मात्र तिकीट मिळवणं रक्षा खडसेंसाठी सोपं नव्हतं. 2020 साली एकनाथ खडसे नाराज असल्यामुळे मुलगी रोहिणी खडसेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.
 
रक्षा खडसेमात्र भाजपतच राहिल्या.
 
महाराष्ट्र टाईम्सच्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे म्हणतात, “रक्षा खडसेंच्या रुपाने एकनाथ खडसेंनी भाजपत परत जाण्याचा एक धागा शिल्लक ठेवला होता.”
 
असं असलं तरी रक्षा खडसेंच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध होता असं जळगावमधले जाणकार सांगतात.
 
जिल्ह्यातल्या एका जेष्ठ पत्रकारांच्या मते, “गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचा रक्षा खडसेंच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध होता. गिरीश महाजनांनी तर असंही म्हटलं होतं की उमेदवार कोण असेल हे नक्की सांगता येणारन नाही. पण कदाचित त्यांच्या एकनिष्ठतेचा त्यांना फायदा झाला असावा. सासरे आणि नणंद दुसऱ्या पक्षात गेल्या तरीही त्या भाजपतच कायम राहिल्या. त्यात त्यांनी मतदारसंघातही चांगलं काम केलं.”
 
एकनाथ खडसेंनी निवडणुकीआधी आपल्याच सुनेविरुद्ध संभाव्य उमेदवारी नाकारल्याची चर्चा आजही रावेर मतदारसंघात होताना दिसते. इतकंच नाही तर रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या पवार गटाचा राजीनामा देऊन सुनेचा प्रचारही केला.
 
तनपुरे म्हणतात, “तेव्हा एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी भाजपत प्रवेश करतो असं जाहीरही केलं होतं पण कदाचित गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांच्या अंतर्गतविरोधामुळे त्यांचा प्रवेश निवडणुकीपूर्वी झाला नाही.”
असं असलं तरी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, “रक्षांताईंना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीहून फोन आला तेव्हा मला अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी भाजपात केलेल्या कामाचं श्रेय आणि पक्षावर ठेवलेली निष्ठा याचं फळं म्हणून तिला शपथविधीला बोलावण्यात आलं आहे.”
 
रक्षा खडसे खान्देशातून केंद्रीय मंत्रिमंडळात जाणाऱ्या पहिल्या महिला मंत्री आहेत.
 
एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार
रक्षा खडसेंकडे मुख्यत्वेकरून एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणूनच पाहिलं जातं. याबद्दल बोलताना तनपुरे म्हणतात, “एकनाथ खडसेंचे पुत्र आणि रक्षा खडसेंचे पती निखिल यांचं 2012 साली निधन झालं. त्यांच्या मुली राजकारणात उशिरा आल्या. पण रक्षा खडसे मात्र 22-23 वर्षांच्या असल्यापासून एकनाथ खडसेंच्या बरोबरीने राजकारणात सक्रिय आहेत. आता तर त्यांना केंद्रीय राजकारणाचा अनुभव आहे, त्यामुळेच त्यांच्याकडे एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जातं.”
 
वैयक्तिक आयुष्य
रक्षा खडसे मुळच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील खेडदिगर गावच्या एका शेतकरी कुटुंबातल्या आहेत. त्या गुर्जर-पाटील समाजातून येतात. त्यांचा विवाह एकनाथ खडसेंचे पुत्र निखिल यांच्याशी झाला.
 
2012 साली निखिल खडसे यांचा मृत्यू झाला.
 
रक्षा खडसेंना कृषिका आणि गुरुनाथ अशी दोन मुलं आहे.
 
उत्तर महाराष्ट्राकडे याआधी किती वेळा मंत्रिपद?
रक्षा खडसेंच्या रूपाने खान्देश म्हणजेच उत्तर महाराष्ट्राला तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपद मिळत आहे. याआधी काँग्रेसचे खासदार विजय नवल यांना केंद्रीय दूरसंचार खातं मिळालं होतं.
 
त्यानंतर 1999 साली अटलबिहारी सरकारमध्ये एरंडोलचे तत्कालीन आमदार एम के पाटील यांना राज्यमंत्रिपद मिळालं होतं.
 
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात गेल्या दोन्ही टर्म्समध्ये धुळे येथून निवडून गेलेल्या सुभाष भामरेंना राज्यमंत्रिपद मिळाले होते.
Published By- Priya Dixit