गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (08:56 IST)

मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय, राणे यांची खोचक टीका

‘बोल्याप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कंगना मुंबईत दाखल झाली. तिच्या घरी देखील गेली. तिने प्रतिक्रियाही दिली आणि शिवसेनेचं नाक कापलं. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का? हा माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. कंगना जर मुंबई महाराष्ट्राचा अपमान करत असेल, तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय,’ अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
 
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. मात्र, त्या अधिवेशनाला काहीही अर्थ नव्हता. या अधिवेशनात आरक्षणासह इतर महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आलेले नाही. त्यामुळे घेण्यात आलेले अधिवेशन पटलेले नसून हे अधिवेशन घेतले नसते तरी चालेल असते. त्यामुळे पुढील अधिवेशन घेण्याची वेळ आलीच तर अडीच तासाचे अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या’, असे म्हणत  राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला केला आहे.
 
राज्य सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांकित वकील दिले नाहीत. राज्य सरकारने नात्या-गोत्यातले साधे वकील उभे केले. चांगला वकील सुप्रीम कोर्टात दिला नाही, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे,’ अशी टीका नारायण राणे यांनी केली.