शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (15:03 IST)

लोकांच्या खाजगी आयुष्यात घुसू पाहणाऱ्या भाजपच्या कुटील डावाला नवाब मलिक यांनी केला तीव्र विरोध

व्हॉटस्ॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्या आधारावर शिक्षा व्हावी. लोकांची खाजगी माहिती गोळा करता यावी. हे सगळं गंभीर व खतरनाक आहे. केंद्रसरकारचा हा सारा खेळ सोशल मीडियाला संपवणं आणि त्याआधारावर लोकांना तुरुंगात टाकणं हा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 
 
केंद्रात सत्तेमध्ये भाजप आहे आणि पुढे आली आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनच याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली आहे. त्याच सोशल मीडियावर आज अंकुश लावण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे असेही नवाब मलिक म्हणाले. 
 
सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनता केंद्रसरकारच्या विरोधात बोलत आहे. आपलं म्हणणं प्रखरतेने मांडताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधात वातावरण निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर अंकुश लावण्याचा आणि लोकांच्या खाजगी आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. 
 
आज व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल केले जात आहेत. परंतु न्यायालय व्हॉटस्ॲप चॅट कायदेशीर पुरावा मानत नाहीय. परंतु केंद्रातील भाजप सरकार व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल व्हावेत. त्याआधारे लोकांना शिक्षा व्हावी अशा प्रयत्नात असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. 
 
दरम्यान भाजपच्या या कुटील डावाचा आणि लोकांच्या खाजगी आयुष्यात घुसण्याच्या कार्यक्रमाला नवाब मलिक यांनी तीव्र विरोध केला आहे.