गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 सप्टेंबर 2022 (09:08 IST)

कोकण रेल्वेच्या प्रवासी गाडय़ा 20 पासून विजेवर चालणार

konkan railway
मडगाव कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी खुष खबर… कोकण रेल्वेतून होणारा प्रवास आता वेगवान होणार आहे. येत्या आठवडय़ापासून या मार्गावरील चार गाडय़ा यापुढे विजेवर चालणार आहेत. त्यानंतर हळूहळू या मार्गावरून सर्व गाडय़ा विजेवर धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.
 
सध्या पहिल्या टप्प्यात 20 सप्टेंबरपासून त्रिवेंद्रम पासून सुटणारी नेत्रावती एक्स्प्रेस विजेवर चालणार असून परतीची 22 रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणारी नेत्रावती विजेवर धावणार आहे. 22 सप्टेंबर रोजी कोचुवेलीपासून सुटणारी कोचूवेली – एलटीटी एक्स्प्रेस ही गाडी विजेवर धावणार असून 23 रोजी मुंबईहून सुटणारी परतीची गाडी विजेवर चालणार आहे.
 
दोन महिन्यांपूर्वी कोंकण रेल्वेच्या पूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाले होते. आतापर्यंत मालवाहू रेलगाडय़ाच विजेवर चालत होत्या. आत्ता प्रवासी गाडय़ा विजेवर चालणार आहे.
 
दरम्यान, कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या 741 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर टप्प्याटप्प्यात विजेवर चालणाऱया गाडय़ा धावू लागणार आहेत. सध्या मुंबई ते रत्नागिरी आणि कारवार ते बंगळुरु या मार्गावर विजेवर चालणाऱया रेल्वेच्या गाडय़ा सुरू झाल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाला नोव्हेंबर 2015 मध्ये सुरुवात झाली होती. एकूण 6 टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात आले.