रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (20:41 IST)

प्रकाश आंबेडकरांनी केले आवाहन, पण जरांगे राजकारणात ‘एन्ट्री’ करतील?

prakash ambedkar
अकोला : मनोज जरांगे हे एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी चांगला लढा देता येईल, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे.
 
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे राजकारणात ‘एन्ट्री’ करतील का? या विषयी सा-यांनाच उत्सुकता
 
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनाला येऊ नये यासाठी सरकारकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाकडून सातत्याने मनोज जरांगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंबईला आंदोलनासाठी न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. असं असलं तरी मनोज जरांगे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. जोपर्यंत संपूर्ण मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
 
गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेली ३५ वर्षे चाललेला आहे. पण इथल्या श्रीमंत मराठ्याने त्याला कधीही स्वरुप आणि आकार दिलेला नाही. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरुपही आलं आणि एक आकारही आला. त्याचबरोबर एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आहे, ज्याला समाजामध्ये सहानुभूती असणारी परिस्थिती आहे. तेव्हा गरीब मराठ्याच्या आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण करायचं असेल तर जरांगे पाटील यांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेबाबत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे’’, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं.
 
मराठ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे
गरीब मराठ्यांचा आवाज, जो आज जरांगे पाटील रस्त्यावर उभा करत आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे. तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे. त्यांचं आंदोलन चालू असताना ते या दृष्टीने सुद्धा विचार करतील, त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील, अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी करत आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.