शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (07:28 IST)

नाराजी नाट्य; अजित पवार शरद पवारांसमोरच व्यासपीठ सोडून निघून गेले

ajit pawar
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या एकीचा संदेश देण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय मंच सजवला खरा पण या बैठकीत मोठेच नाट्य घडले. राष्ट्रवादीत सर्व काही ठीक नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी व्यासपीठ सोडले. यानंतर त्यांची वाट पाहण्यात आली, मात्र ते परत आलेच नाहीत. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते. अजित पवारांच्या नाराजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात व्यासपीठावर सर्वपक्षीय दिग्गज उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्यानंतर अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्याची संधी देण्यात आली. कदाचित अजित पवारांना ही गोष्ट आवडली नाही. त्यामुळे ते स्टेजवरून उठले आणि निघून गेले. यानंतर सुप्रिया सुळे त्यांचे मन वळवण्यासाठी गेल्या, मात्र त्या परतल्याच नाहीत. त्याचवेळी मंचावर उपस्थित प्रफुल्ल पटेल यांनी समर्थकांची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला. विशेष म्हणजे २०१९ मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देऊन महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून काका-पुतण्या यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
 
शरद पवार यांनी या अधिवेशनात भाषण करताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांसमोर आपला पक्ष कधीही शरण जाणार नाही. भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी बिगरभाजप पक्षांनी एकत्र काम करायला हवे. त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कसे सामोरे जायचे आणि देशातील धार्मिक अल्पसंख्याकांविरोधात पसरवले जाणारे द्वेष या मुद्द्यावरून केंद्र सरकारला फटकारले. दरम्यान, पुढील राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.