रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (21:47 IST)

मेळघाटात भीषण दुष्काळ; अमरावतीत 11 गावांना टँकरने पाणी

water draught
विदर्भात सध्या सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे पाण्याचे जलस्त्रोत आटले असल्याने अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील लोकांची पाण्यासाठी वणवण  सुरू आहे. मेळघाटातील  चिखलदरा तालुक्यात 10 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 11 गावात टँकरने पाणी पुरवठा सध्या करण्यात येत आहे. मे महिन्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे.
 
तापमानवाढ व भूजलपातळी खोल गेल्याने उंचावरील खास करून मेळघाटातील गावांचे जलस्रोत कोरडे पडले आहेत. याकरिता काही योजना व विहीर अधिग्रहणासोबतच टँकरचे नियोजन केले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मेळघाटातील 10 गावे सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत असल्याने मे अखेरिस या ठिकाणी पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
 
जिल्ह्यात पाणी टंचाईसाठी नवीन नळयोजना, विहीर अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण, नळ योजनांची दुरुस्ती, नवीन नळ योजना घेणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी घेणे, हातपंपांची दुरुस्ती, टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करणे आदी उपाययोजना प्रस्तावित असून यावर काम सुरू असल्याचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.