महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिली मोठी भेट
महाराष्ट्रात एमएसआरटीसी १५ हजारांहून अधिक एसी आणि नॉन-एसी बस चालवते. तसेच आता एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ७ टक्क्यांनी वाढवला आहे. त्यामुळे आतापर्यंत ४६% मिळत असलेला डीए ५३% झाला आहे. यासोबतच सुरक्षेसाठी अपघात विमा संरक्षणासारख्या नवीन सुविधा देखील लागू करण्यात आल्या आहे. त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींनाही मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महागाई भत्ता वाढवण्याची मागणी राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांकडून बऱ्याच काळापासून केली जात होती. या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये जून २०२५ पासून मूळ पगारावर ५३% महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सोबत करार करून अपघात विमा संरक्षण योजना लागू करण्यात आली आहे. एसबीआयमध्ये पगार खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असो वा नसो, अपघात झाल्यास विम्याचा लाभ मिळेल. याअंतर्गत अपघातात मृत्यू झाल्यास १ कोटी रुपयांचा, पूर्ण अपंगत्व आल्यास १ कोटी रुपयांचा आणि अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जाईल.
तसेच राज्य सरकारने निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींना एक विशेष भेट देखील दिली आहे. त्यांना एक वर्षासाठी एसटी बसमध्ये मोफत प्रवास पासची सुविधा दिली जाईल. सुमारे ३५,००० निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमाचे एसटी कर्मचारी कौतुक करत आहे.
Edited By- Dhanashri Naik