बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (16:05 IST)

राज्यात अघोषित लोडशेडिंग सुरू, सलग २ ते ३ तास वीज पुरवठा ठप्प

राज्यात अनेक भागात सलग २ ते ३ तास वीज पुरवठा बंद केला जात आहे. सध्या राज्यात ऑक्टोबर हिट सुरू असतानाच शहरासह ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ पेक्षा अधिक संच बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला आहे. वीजेची तूट काही केल्या भरुन निघत नसल्याने आणि सणासुदीतच नागरिकांचा रोष सहन करावा लागू नये म्हणून अघोषित लोडशेडिंग सुरू करण्याच आले आहे. तसे, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
 
वीजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यात कुठलेही यश येत नाही. वीजेची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत असल्याने लोडशेडिंगशिवाय अन्य पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच, सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 
 महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.