1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (08:20 IST)

Bridge of Samriddhi Highway collapsesशहापूरजवळ समृद्धी महामार्गाचा निर्माणाधीन पूल कोसळला, 16 जणांचा मृत्यू, 3 जखमी

Under construction bridge
ANI
bridge of Samriddhi Highway collapses  ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातल्या सरलांभबे गावाजवळ बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून 16 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक गर्डर मशीन कोसळल्याने ही घटना घडली आहे.
 
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी हा पूल बांधण्यात येत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ANI ने ही बातमी दिली आहे.
 
NDRF चं पथक घटनास्थळी पोहोचलं असून आतापर्यंत 14 मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच तीन जण जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 
आणखी 6 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
जखमींना शहापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
प्रिकास्ट केलेला कॉलम फिट करताना हा अपघात झाल्याचं मंत्री दादा भुसे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यात 16 जणांचा मृत्यू झाल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. इतर अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
दादा भुसे यांनी अपघाताची माहिती मिळताच या भागाचा दौरा केला. मृतांच्या नातेवाईकांना सरकार मदत करेल असंही स्पष्ट केलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीय सुळे यांनी ट्वीट करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
"शहापूर,ठाणे येथे गर्डर कोसळून मोठी जिवितहानी झाली. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद असून, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
 
तर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करून या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
 
"शहापूर येथे क्रेन कोसळून झालेल्या अपघातात काही कामगार मृत्यूमुखी पडल्याची बातमी ह्रदयद्रावक आहे. महामार्ग निर्मितीच्या कामांमध्ये वाढत असलेले अपघात पाहता या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे," असं ट्वीट ठाकूर यांनी केलं आहे.
 
समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे?
मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी हायवेमुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागतील. 701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे.
 
औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी 4 तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी 4 तास लागतील.
 
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 55 हजार 477 कोटी रूपये आहे.
 
हा मार्ग राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांचा सामावेश आहे.
 
20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र
या मार्गावर 50 हून अधिक उड्डाणपूल आणि 24 इंटरचेंजेस आहेत. हे इंटरचेंजेस वाहनांसाठी एक्झिट पॉईंट आहेत.
 
दर पाच किलोमीटरवर अत्यावश्यक टेलिफोनची सुविधा, फूड प्लाझा, रेस्टॉरंटस्, बस बे, ट्रक टर्मिनस, ट्रॉमा सेंटर या महामार्गावर असतील, असं सांगण्यात आलं आहे.
 
समृद्धी महामार्गावर वायफायची सुविधा असेल. तसंच ट्राफिक कंट्रोलसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
 
महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या महामार्गावर लँडस्केपींग, ब्रिज ब्युटीफीकेशनची सुविधा असेल.
 
हा महामार्ग वनक्षेत्रातून जात असल्यामुळे वन्यजीवन प्राण्यांच्या मुक्त वावरासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.
 
या भुयारांमध्ये वाहनांचे आवाज रोखण्यासाठी ध्वनी विरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
 
सुरुवातीला विरोध नंतर बाळासाहेबांचंच नाव
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात समृद्धी महामार्गाची घोषणा करण्यात आली. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पासाठी जमिन भूसंपादनाला अनेक ठिकाणी कडाडून विरोध झाला.
 
पाच पट मोबदला देऊन जमिन भूसंपादीत करण्यात आली. सुरवातीला शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शिवसेनेने समृद्धी महामार्गाला विरोध केला पण नंतर पक्षाने आपली भूमिका बदलली.
 
या महामार्गाला हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नावं देण्याची मागणी 2014 च्या युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती. पण भाजपकडून अटलबिहारी वाजपेयींचं नाव देण्याचा आग्रह होता.
 
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पेच निर्माण झाला. नोव्हेंबर 2019 ला महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हे नावं बदलून हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ठेवलं.