1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जुलै 2023 (21:00 IST)

बिनकामाची माणसं….उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल ; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई : भाजप आणि शिंदे गटाने इतके प्रयत्न करुनही अजूनही शिवसेना संपलेली नाही. इतकं सगळं होऊनही शिवसेना संपत कशी नाही, हा प्रश्न सध्या त्यांना सतावत आहे. मात्र, मी भाजप आणि शिंदे गटाचा आभारी आहे. त्यांनी प्रत्येक आठवड्याला आमचा एक-एक माणूस फोडत राहावा.
 
बिनकामाची सगळी माणसं तुम्हाला घ्या. मात्र, यामुळे शिवसैनिक हे पुन्हा पेटून उठतात. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट जे काम करत आहे, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या या कृतीमुळे शिवसेना पुन्हा नव्याने जोमाने उभी राहत आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
 
शुक्रवारी सायन कोळिवाड्याचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी सायन कोळिवाड्याचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  त्यानंतर आज सायन कोळिवाडा येथील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
 
दरम्यान आम्ही तुमच्यासोबतच आहोत असं अश्वासन त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिनकामाची माणसं जाऊद्या, त्यामुळे शिथिलता आलेला शिवसैनिक पेटून उठेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलत होते.
 
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे. मिंधे आणि भाजपला सांगतो दर आठवड्याला माझा एक माणूस फोडा, त्यामुळे शिथिलता आलेले शिवसैनिक पेटून उठतील. बिनकामाची माणसं जाऊद्या, एक-एक फोडण्यापेक्षा निवडणुका घ्या’ असं थेट आव्हानच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेल शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor