लोकांचे प्रेम पाहून भावूक होतो
प्रिय ज्ञान,
२६ जानेवारी हा दिवस पुन्हा एकदा उगवला आणि काही तासांत तो मावळेल सुद्धा. या दिवशी राजपथावर संचलनात राष्ट्रपती म्हणून सलामी घेण्यासाठी जातो त्यावेळी मी अतिशय भावूक होतो. कारण राजपथाच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रपतींबद्दल जे भाव दिसतात, त्यामुळे मला गदगदून येते. आज सकाळीसुद्धा माझ्या मनात हेच विचार येत होते. मी भारावून एखाद्या यंत्रासारखा हात जोडत सलामी मंचापर्यंत पोहोचलो. सलामीनंतर तीन वीरांना मरणोत्तर अशोकचक्र, प्रथम श्रेणीची पदके देणअयाचा होता. या जवानांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान केले होते. या पुरस्काराचे मानपत्र वाचले जात असताना मी स्वतःला रोखू शकलो नाही. आधीच मी काहीसा भावू झालो होतो आणि या वीरांच्या कर्तृत्वाची गाथा ऐकून ह्रदय विव्हल झाले. नकळत डोळ्यातून अश्रू झरू लागले. काही तरी बहाणा करून मी रूमालाने ते पुसले. त्या वीरांची विधवा पत्नी व वृद्ध पित्याचे ओले डोळे पाहून मला रहावले गेले नाही. त्या स्थितीत माझे सहानुभूतीचे अश्रू ओघळले आणि त्यांच्या दुःखाची सहवेदना माझ्यापर्यंतही भिडली.
पण हे सगळे झाल्यानंतर विध्वंसात्मक शस्त्रांचे प्रदर्शन झाले. ही शस्त्रे मिळविण्यासाठी आणि तयार करण्यासाठी आपण इतर देशांचीही मदत घेत आहोत. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे लोक समोर आले. यांना स्वतःच्या जीवाचे बलिदान करणअयाचे आणि दुसऱ्याचा जीव घेण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले होते. आपल्या ह्दयातून आणि मेंदूतून या निरर्थक विचारांना काढून टाकण्याचा काही मार्ग नाहीये का? मानवी बुद्धीचा उपयोग ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुख समृद्धी मिळविण्यापेक्षा विध्वंस आणि मृत्यूला आवाहन करण्याइतकी मानवता मुर्ख झाली आहे का?
- डॉ. राजेंद्र प्रसाद
(२६-१-१९५८ ला आपल्या मुलीसमान डॉ. ज्ञानवती दरबार यांना लिहिलेले पत्र.)
