भारतीय पुरूषांच्या हॉकी संघाने २००७ मध्ये आशिया कप जिंकला असला तरी आठ वेळा ऑलिंपिक विजेता होणाऱ्या या संघापुढे पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांसाठी पात्र ठरण्याचे आव्हान आहे.आशिया कप विजेतेपद वगळले तर भारतीय पुरूष व महिला संघ २००७ मध्ये फार काही विशेष करू शकलेले नाही. ऑलिंपिकमध्येही हे संघ पात्र ठरू शकले नाही यावरूनच संघांची कामगिरी लक्षात घ्यावी. या वर्षी हॉकीच्या दृष्टीकोनातून घडलेली चांगली बाब म्हणजे २०१० मध्ये होणाऱ्या पुरूष हॉकी विश्वकरंडकाचे यजमानपद भारताला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आपली गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा कमावण्यासाठी दिल्ली येथे विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद खेचून आणण्यात यश मिळविले आहे. या अंतर्गतच ऑस्ट्रेलियातील रिक चार्ल्सवर्थ यांना भारतीय हॉकीचे तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. निराशाजनक कामगिरीमुळेच भारतीय खेळाडू व प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेत कुठेही दिसले नाहीत. आशिया कपमध्ये चौदा गोल करून भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा प्रभूज्योतसिंग आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या स्पर्धेत होता. पण ऑस्ट्रेलियाच्या जेमी ड्वेयर याने बाजी मारत पुरस्कार पटकावला. महिलांमध्ये तर एकीलाही नामांकन मिळू शकले नाही, यातच सारे काही आले. यंदा कोणत्याही हॉकी खेळाडूला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान मिळू शकला नाही. अर्जुन पुरस्कारही फक्त ज्योती सुनीता कल्लूला मिळाला. द्रोणाचार्य पुरस्कार या क्षेत्राला मिळाला नाही. वीरेंदर सिंह यांनाच फक्त जीवनगौरव पुरस्कार व ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात आले. तुघलकी निर्णय घेण्याची परंपरा याही वर्षी पाळण्यात आली. आशिया कपमध्ये प्रत्येक गोलसाठी बक्षिस व आपल्या संघावर गोल झाल्यास दंड असा विचित्र नियम महासंघाचे अध्यक्ष के. पी. एस. गिल यांनी काढला. ज्याच्यावर सर्वत्र टीका झाली. भारतीय पुरूषांचा संघ नवे प्रशिक्षक जोकिम कारवाल्हो यांच्या नेतृत्वाखाली ५ ते १३ मेपर्यंत मलेशियात अझलह शाह हॉकी स्पर्धा खेळायला गेला. पण तेथे तिसऱ्या क्रमांकापर्यंतच संघाने धडक मारली. सेमी फायनलमध्ये मलेशियाकडून भारताला २-१ असा पराभव पत्करावा लागला. अखेर कास्य पदकासाठी झालेली लढत भारताने दक्षिण कोरीयाला हरवून जिंकली.