शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (16:46 IST)

युद्धतंत्राचा निर्माता दिग्दर्शक : शिवजयंती निमित्त . .

जगाच्या पाठीवर अनेक सम्राट झाले. अनेकांनी आपापली साम्राज्ये, सत्ता परकियांना तावडीत जाऊ नये  म्हणून आपल्या तलवारी पाजळल्या. परंतु केवळ आणि केवळ   रयतेच्या कल्याणासाठी तलवारींच्या संग्रामाशिवाय व तलवारींच्या संग्रामासह वेगवेगळ्या  युद्धतंत्राचा वापर करून चौफैर शत्रूंशी तोंड देऊन अगदी शून्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा जगाच्या पातळीवरील एकमेव ठरला तो छत्रपती शिवाजी राजा. अतिप्राणघातक प्रसंगातून ते वारंवार सहीसलामत सुटले ते त्यांच्या संतुलित निर्णय क्षमतेमुळेच. मोठ्या आत्मविश्वासाने हे त्यांना शक्य झाले.

आपला जाणता राजा, नीतिवंत राजा आपल्याला केव्हा साद घालेल यासाठी स्वराज्याचे पाईक असलेले मर्द मावळे वाटच बघत असत. दोन-चार भाकरी लसूण मिरचीचा ठेचा अन् सोबतीला कांदा एवढ्या शिदोरीवर आदेश येताच 'जी राजे' म्हणून भरल्या ताटावरून, भरल्या प्रपंचातून उठून जीव घोड्यांच्या टापावर चौखूर उधळायला तयार असणारी   जिगरबाज माणसं मोठ्य गुणग्राहकतेनं राजांनी या स्वराज्याच्या कामी गोळा केली होती.  राजांचा हात ज्याच्या खांद्यावर पडला व स्वराज्याच्या निकडीचे दोन शब्द कानावर पडले की तो खांदा स्वराज्याचा खंदा समर्थक झालाच म्हणून समजा. हे एक युद्धतंत्रच होतं स्वराज्याला लागणारं मनुष्यबळ गोळा करण्याचं. यातून राजांनी बर्हिजी नाईक, संभाजी कावजी, कोंढाळकर, जिवा महाले, शिवा काशीद, तानाजी मालुसरे, गोपीनाथपंत बाजीप्रभू देशपांडे. मुरारबाजी, नेताजी पालकर, मदारी मेहतर, इब्राहिम खान, कान्होजी जेधे, झुंजारराव मरळ, येसाजी कंक, सिद्धी हिलाल, प्रतापराब गुजर, हंबीरराव मोहिते, हिरोजी  इंदूलकर, दर्या सारंग, दौलतखान इत्यादींसारखी स्वराज्यरत्ने हेरली व स्वराज्याच्या   रक्षणासाठी व निर्मितीसाठी मोठ्या खंबीरपणे उभी केली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचाही अंमल करून थंड डोक्यांने युद्धतंत्रे-युद्धनीती विकसित केली. जिथे तलवारींचा उपयोग होत नाही तेथे आपली बुद्धी पणाला लावून सर्वच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत हेही जगाला दाखवून दिले होते. प्रसंगी राजांनी आलपी जीभ मधाळ तलवारीसारखी चालविली म्हणून तर प्रतापगडावरील जीवघेण्या संकटातून महाराज निभावून निघाले.  अफजलखानाशी सामना कसा करायचा हा यक्षप्रश्न राजांपुढे होता. यासाढी राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि शहाजी राजांचा मित्र रणदुल्ला खानाचा मुलगा यांच्यात चर्चा जाझाली. वाघनखे तयार करण्याचे ठरले. रुस्तुम-ए-जमातने अत्यंत धारदार, हातात सहज मावतील व उघडली जातील, हाताच्या बोटामध्ये दागिने भासावीत  अशी वाघनखे बनवून राजांना दिली आणि पुढे स्वराज्यावर आलेलं अफजलखानरूपी संकट राजांनी मोठ्या धैर्याने पेललं.

छत्रपती शिवाजी महाराज अनेक पटींनी वरचढ असणार्‍या शत्रूंना जेरीस आणत असत. मुख्यत्वे अमावास्येला मध्यरात्री काळोखात लढाईला सुरुवात होण्यापूर्वी सैन्याच्या तीन तुकड्या केल्या जायच्या. एका तुकडीने हल्ला करायचा. एका तुकडीने भिऊन पळाल्याचे सोंग करून हत्ती- उंटाच्या बोजड शत्रू सैन्याची दमछाक होईपर्यंत त्यांना मागे पळवत आणायचे ते तिसर्‍या तुकडीने दबा धरलेल्या ठिकाणापर्यंत आणि मग तिसर्‍या तुकडीने नव्या दमाने हल्ला चढवायचा आणि शत्रूला घायाळ करून टाकायचे. ह्या शिवसूत्राचा अभ्यस करून 'मिडोल कॅस्ट्रो' या इतिहासकाराने राजांच्या या युद्धतंत्राचं मोठं कौतुक केलं आहे.

कधी कधी राजांज्या लढाया रक्ताचा एक थेंबही न सांडता ते जिंकायचे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजांनी पुरंदर किल्ला मोठ्या सुपीक डोक्याने स्वराज्यात आणला. पुरंदरच्या  किल्लेदाराला विश्वासात घेतले त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि स्वराज्याच्या महिमा त्याच्या गळी उतरवला व लगलीच त्याने आदिलशाहीचा निशाणी-चांदतारा किल्ल्यावरून खाली उतरवला व भगवा झेंडा मोठ्या दिमाखात वर चढवला. मानसशास्त्रीय फासे टाकत अनेक वेळा राजांजी शत्रूला जेरीसही आणले आहे. फत्तेखानची पुरंदरची स्वारी पाहिली तर अगदी सुरुवातीला मराठ्यांचा प्रतिकारच नाही, हे खानाच्या लक्षात आले व तो अशा निष्कर्षाप्रत पोहचला की न लढताच किल्ला बहुधा आपल्या ताब्यात येतोय. यामुळे तो जाम खूश झाला आणि नंतर अचानकच राजांच्या सैन्याची निसर्गात उपलब्द असणार्‍या  दगड-धोंड्यांची, शिळांची व गोफण गुंड्यांची टोळधाड खानाच्या सैन्यावर बसरली आणि  राजांनी या लढाईत फत्तेखानाचा पराभव करून स्वत: फत्ते झाले.

नियोजनपूर्वक  साहस करणे हा राजांचा स्वभाव होता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याच्या लाल महालातील प्रसंग. शाहिस्तेखानाने लाल महालाला घट्ट विळखा घातला होता. राजांनी यावरही मात केली. वेषांतर करून विवाह सोहळ्याच्या वरातीत घुसून राजांनी  लाल महालात प्रवेश केला व खानावर हल्ला चढबला. यात खानाची बोटे छाटली गेली.  ही बातमी वार्‍यासारखी औरंगजेब बादशहाच्या कानावर जाऊन थडकली अन् औरंगजबालाही   आपली बोटे चक्क तोंडात घालावी लागली. पन्हाळगडाला सिदी जोहरचा कडक व कडवट असा पहारा असतानाही राजांनी डबल रोलची संकल्पना उपयोगात आणली व शिवा काशीदला प्रती शिवाजी बनवले शत्रूला झुलवत ठेवले आणि शिवा काशीदनेही हसत हसत मरणाला स्वीकारत स्वराज्यासाठी बलिदान दिले.

आरमारदल तंत्र राजांनो दूरदृष्टीने जगाला दाखवून दिले. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या सारखे सागरी किल्ले स्वराज्याच्या सुरक्षेसाठी उभारले. याची किती आवश्यकता आहे हे आपल्याला मुंबईवरील २६ / 11 च्या हल्ल्यावरून लक्षात आलेले आहे. अनेक क्रांतिकारकांना त्यांची युद्धनीती प्रेरणादायी राहिली. अशा या युद्धतंत्राचा निर्माता राजा शिवछत्रपती महाराजांना सन्मानाचा मुजरा. 
हरिश्चंद्र खेंदाड