Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३४

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:47 IST)
 
गोरक्षनाथानें आपल्या 'किमयागिरी' नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपपल्या शक्त्यनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्येक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें धर्मनाथ बीजेचा महिमा होय.
 
धर्मनाथास नाथदीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत फिरत बदरीकाश्रमास जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायांवर घातलें व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसविलें. नंतर, बारा वर्षांनीं परत येऊं असें सांगुन तो तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरतांच ते पुनः बदरिकाश्रमास गेले मग तेथें मोठ्या थाटानें मावंदे केलें. मावंद्याकरितां सर्व देवांना बोलावुन आणलें होतें. मावदें झाल्यावर सर्व देव वर देऊन निघुन गेले. व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनथ, चौरंगीनाथ, अडभंगनाथ व धर्मनाथ असे पांचीजण तीर्थयात्रेस गेले.
 
ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वी अठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले; त्याच वेळीं जे थोडेंसे रेत पृथ्वीवर रेवानदीच्या तीरीं पडलें न्यांत चमसनारायणानें संचार केला; तेव्हां पुतळा निर्माण झाला. तें मूल सुर्यासारखें दैदीप्यमान दिसूं लागलें. जन्म होतांच त्यानें एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला. त्याच संधीस सहन सारुख या नांवाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता. त्यानें तें मूल रेतीत रडत पडलेलें पाहिलें; तेव्हां त्याचें हृदय कळवळलें. त्यानें त्या मुलांस उचलून घेतलें व घरीं नेलें आणि रेवातीरीं वाळवंटावर पुत्र मिळाल्याचें वर्तमान स्त्रीस सांगितलें व त्यास तिच्या हवली केलें. तिनें आनंदानें त्यास स्नान घालून पाळण्यांत आपल्या पोटच्या मुलाशेजारीं निजविलें. तो रेवतीरीं ' रेवेतं ' सांपडला म्हणुन त्याचें नांव ' रेवणनाथ ' असें ठेविलें. त्यास थोडथोडें समजूं लागतांच तो काम करावयास बापाबरोबर शेतांत जाऊं लागला. तो बारा वर्षांच्या वयांत शेतकीच्या कामांत चांगलाच हुशार झाला.
 
एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेंच उठून आपले बैल रानांत चरावयास नेत होता. त्या समयीं लखलखीत चांदणें पडलें होते; ह्यामुळें रस्ता साफ दिसत होता. इतक्यांत दत्तात्रेयाची स्वारी पुढें येऊन थडकली. दत्तात्रेयास गिरिनारपर्वतीं जावयांस होतें. त्यांच्या पायांत खडावा असून त्यांनीं कौपीन परिधान केली होती, जटा वाढविल्या असुन दाढी, मिशी पिंगट वर्णाची होती. असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय ते जात असतां त्यांची व रेवणनाथाची भेट झाली. त्यास पाहतांच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचें स्मरण झालें. मग आपण पूर्वीचें कोण, व हल्लीचें कोण व कसें वागत आहों याची त्यास रुखरुख लागली. तसेच मला आतां कोणी ओळखत नाहीं, मी अज्ञानांत पडलों असें त्यास ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला. तेव्हां तूं कोण आहेस, असें दत्तात्रेयानें त्यास विचारल्यवर त्यानें उत्तर दिलें, तुमच्या देहांत तिन्ही देवांचे अंश आहेत; त्यांत सत्त्वगुणी जो महापुरुष तो मी असुन मला येथें फारच कष्ट भोगावे लागत आहेत; तर आतां कृपा करुन या देहास सनाथ करावें. इतकें बोलून त्यांनें दत्तात्रेयाच्या पायांवर मस्तक ठेविलें. त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयानें आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. नऊ नारायणाच्या अवतांरांपैकीं हा चमसनारायणाचा अवतार होय, हें दत्तात्रेयास ठाऊक होतें.
 
त्यास दत्तात्रेयानें त्यास वेळेस अनुग्रह कां दिला नाहीं अशी शंका येईल. पण त्याचें कारण असें कीं, भक्तिमार्गाकडे प्रवृत्ति झाल्यावांचून अनुग्रह देऊन उपयोग नाही; यास्तव भक्तीकडे मग लागलें म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होतें असा मनांत विचार आणुन दत्तात्रेयानें फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली. तेव्हां रेवणनाथास परमानंद झाला. तो त्याच्या पायां पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले. एक सिद्धि प्राप्त झाली तेवढ्यावरच त्यानें समाधान मानल्यानें तो पूर्ण मुक्त झाला नाहीं.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

Somvar Mahadev Mantra Jap सोमवारी करा महादेवाच्या मंत्रांचा जप

आरती सोमवारची-आधार चक्र नृत्य मांडिलें थोर

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

संकष्टी चतुर्थी: गणपतीला अर्पण करा या ३ गोष्टी, विघ्ने दूर होण्याची मान्यता

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments