Dharma Sangrah

ऑस्कर पुरस्कार कोण देतं? विजेते कसे निवडले जातात?

Updated: सोमवार, 11 मार्च 2024 (11:04 IST)
 
ऑस्कर पुरस्कार कसे दिले जातात?
भारतात वर्षभरात हजारो सिनेमे वेगवेगळ्या भाषांमध्ये बनतात, जगभरात तर असे लाखो सिनेमे रिलीज होतात. पण ऑस्करच्या नामांकनासाठी पात्र ठरायच्या काही अटी असतात -
 
तो सिनेमा किमान 40 मिनिटांचा असावा
लॉस एंजेलिसमधल्या कुठल्याही थिएटरमध्ये तो किमान सात दिवस दाखवण्यात आलेला असावा
तो जानेवारी 1-डिसेंबर 31 या दरम्यान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला असावा, आणि त्याआधी तो कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला नसावा

अर्थात या अटींना अपवाद असतात फॉरेन लँग्वेज कॅटेगरीसाठी जाणार सिनेमे, जसं की भारताकडून यापूर्वी गेलेले मदर इंडिया, सलाम बाँबे, लगान हे हिंदी सिनेमे किंवा मराठीतले श्वास, हरिशचंद्राची फॅक्ट्री आणि कोर्ट. या कॅटेगरीसाठी प्रत्येक देश एकच सिनेमा पाठवू शकतो.
 
या सर्व अटी पाळणाऱ्या सिनेमांना मग त्यातील कलाकारांच्या नावांसह एक अर्ज अकादमीला करावा लागतो. त्यातून मग अकादमी नामांकनांसाठी पात्र सिनेमांची यादी, एक Reminder List जाहीर करतं, ज्यात जगभरातले 400पेक्षा जास्त पात्र सिनेमे असू शकतात. मग यातून अकादमीचे सदस्य अंतिम 5 निवडतात आणि मग त्यातून अंतिम विजेता घोषित केला जातो.
 
अकादमीचे सदस्य विजेते कसे निवडतात?
तर अकादमी ऑफ मोशन पिच्चर आर्ट्स आणि सायन्सेसचे सदस्य हे सिनेविश्वातल्या त्यांच्या कामानुसार 17 शाखांमध्ये विभागलेले असतात – अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, संगीतकार, डॉक्युमेंट्री मेकर, सिनेमॅटोग्राफर, कॉस्च्युम डिझाईनतर, साउंड डिझाईन, विझ्युअल इफेक्ट्स, मेकअप, इत्यादी. कुणालाही एकापेक्षा जास्त शाखेत स्थान देता येत नाही. याच 17 शाखांमधल्या एकूण सदस्य कलाकारांपैकी दरवर्षी काही कलाकारांची एक ज्युरी तयार होते. या ज्युरी मेंबर्सची नेमकी यादी कधीच जाहीर होत नाही, पण कुणाकुणाला अकादमीने निमंत्रित केलंय, याची यादी कळते.
 
हे ज्युरी मेंबर्स त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातल्या 20 पेक्षा जास्त कॅटेगरींमधले विजेते निवडतात. म्हणजे ज्युरीमधले अभिनेते सदस्य फक्त सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता वा अभिनेत्री, या पुरस्कारांसाठी मतदान करू शकतात. तर संगीतकार ज्युरी हे सर्वोकृष्ट गाणं आणि सर्वोकृष्ट पार्श्वसंगीताची निवड करू शकतात.
 
याचं गणित सोपं आहे – अंतिम 5 नामांकनांपैकी ज्याला सर्वांत जास्त मतं, तो विजेता ठरतो.
फक्त एका पुरस्कारासाठी सर्व सदस्य मतदान करू शकतात – सर्वोत्कृष्ट सिनेमा अथवा Best Motion Picture. आता तो कसा निवडला जातो? त्यासाठी Preferential Ballot System नावाची एक पद्धत वापरली जाते, ज्यात ज्युरी सदस्यांना प्राधान्यक्रमाने मतं द्यावी लागतात. या एकमेव गटासाठी 10 नामांकनं असतात. आणि ज्याला अर्ध्याअधिक मतं मिळतील, तोच सिनेमा जिंकतो. म्हणजे काय?
 
समजा सुरुवातीला A, B, C, D, E, F, G, H, I, J असे दहा सिनेमे आहेत. तर सदस्यांना या सिनेमांचा क्रम त्यांच्या पसंतीनुसार द्यावा लागतो.
समजा यापैकी एकाही सिनेमाला जर 50 टक्क्यांपेक्षा जास्त पहिल्या पसंतीची मतं मिळाली, तर तो सिनेमा सहाजिकच The best Motion Picture ठरतो. पण जर चित्र स्पष्ट नसेल, तर आधी या दहामधून ज्या सिनेमांना सर्वांत कमी मतं मिळाली आहे, ती काढली जातात, आणि त्यांच्या यादीतलं दुसरं मत ज्या सिनेमाला आहे, त्याकडे त्याचे गुण वळवले जातात.
 
समजा एका सदस्याने सिनेमा Cला पहिली पसंती दिली होती, पण तो पहिल्या राउंडमध्ये सर्वांत खाली आला, तर मग त्याच सदस्याचं मत दुसऱ्या पसंतीच्या सिनेमाकडे वळवलं जातं. असं करत करत सर्वांत कमी गुण मिळवणारे सिनेमे तोवर काढले जातात, जोवर एक कुठलाही सिनेमा बहुमताचा आकडा गाठत नाही. आणि तेव्हाच मिळतो सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार.
 
ऑस्करमधले वाद आणि टीका
तुम्हाला विल स्मिथने होस्ट ख्रिस रॉकच्या थोबाडित मारल्याचा हा क्षण आठवतच असेल. हा काही पहिला प्रसंग नव्हता जेव्हा अकादमी पुरस्कारांवरून वाद झाला होता. 2016मध्ये ऑस्कर लाईव्ह सोहळ्यातल्या सर्वांत महत्त्वाच्या क्षणी म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्काराची घोषणाच चुकली होती. नाव जाहीर झालं लालालँडचं, विजेता होता मूनलाईट.

हे तर ताजे वाद झालेत.
1973च्या पुरस्कार सोहळ्यात ‘द गॉडफादर’ या गाजलेल्या सिनेमासाठी मार्लन ब्रँडो यांना सर्वोत्कष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो नाकारायला त्यांनी एका तरुण हक्क कार्यकर्तीला पाठवलं होतं, जिने त्यांचा संदेश तेव्हा अकादमीपर्यंत पोहोचवला होता. तिच्या भाषणावर जनतेने ओरडून रोष व्यक्त केला होता, ज्यासाठी अकादमीने अगदी 2022मध्ये माफी मागितली होती.
 
इतकंच नव्हे तर अनेकदा अकादमीवर श्वेतवर्णीयांना झुकतं माप देण्याचा आरोप झाला आहे. #OscarsSoWhite हा सोशल मीडियावरचा हॅशटॅग एक चळवळ म्हणून अनेक वर्षांपासून सुरू आहे, ज्याचा परिणाम म्हणून आज अकादमीतच नव्हे तर नामांकनांमध्येही बरंच वैविध्य पाहायला मिळतं.
म्हणूनच कोरियन भाषेतला द पॅरासाईट हा 2020मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मान पटकावणारा पहिला बिगरइंग्रजी सिनेमा ठरला.
 
भारताची ऑस्करमधली कामगिरी
ऑस्कर म्हटलं की आधी आठवतं ए आर रहमानचं 'जय हो'. खरंच 2009 साली स्लमडॉग करोडपती या सिनेमानं इतिहासच रचला आणि भारतात एकाच वर्षात तब्बल 4 ऑस्कर ट्रॉफी आल्यात.
 
यापैकी दोन ए आर रहमान यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी, अर्थात जय हो. याच गाण्यासाठी गुलझार यांनाही सहपुरस्कार देण्यात आला.
 
याशिवाय बेस्ट साउंड मिक्सिंगसाठी रसूल पुकुट्टी यांना रिचर्ड पाईक आणि इयन टॅप यांच्यासह ऑस्कर देण्यात आला.
अर्थात हा सिनेमा परदेशी भाषेच्या गटामध्ये नव्हता. हा मूळ ब्रिटिश इंग्लिश सिनेमा होता ‘स्लमडॉग मिलियनेअर’, त्यामुळे त्याला इतक्या कॅटेगरींमध्ये नामांकन मिळालं होतं.
 
पण तुम्हाला माहितीय, भानू अथय्या या ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या – 1983 साली आलेल्या रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी या सिनेमासाठी. तर सत्यजित रे यांनाही 1992 साली त्यांच्या सिनेक्षेत्राला योगदानासाठी ऑस्करने सन्मानित करण्यात आलं होतं.
 
Published By- Priya Dixit 
 
 

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

'रामायण'मधील पहिले गाणे 'जय जय राम' प्रदर्शित, साई पल्लवी-रणबीर कपूरच्या 'सिया राम' लूकने प्रेक्षकांची मने जिंकली

'हनुमान अंश'नंतर विशाल चतुर्वेदीने 'राम बोला' या नवीन चित्रपटाची घोषणा केली

गणेश चतुर्थीला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी केले बाप्पाचे स्वागत

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील पहिले गाणे 'जय जय राम' गणेश चतुर्थीला प्रदर्शित

अष्ट विनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीच्या आठ पवित्र मंदिरांचा समूह

पुढील लेख
Show comments