शाळेतील मुले अभ्यासाच्या आणि खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरून जातात. वय, उंची आणि वजनासुनार मुलांनी साधारणपणे दीड ते दोन लिटर पाणी प्यावयास हवे. बर्याच पालकांची तक्रार असते की, मुलांनी घरातून भरून नेेलेली पाण्याची बाटली तशीच परत आणतात. पाणी कमी प्यायल्यामुळे मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्यांना थकवा येणे, मूत्रमार्गात संसर्ग होणे, मुतखडा होणे, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी मुबलक पाणी प्यावे व आजारांपासून दूर राहावे यासाठी राज्य सरकारने सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेच्या वेळापत्रकात तीन वेळा पाणी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.