Marathi Biodata Maker

देवेंद्र फडणवीसांची गृहखात्यावरची पकड सैल झाली आहे का?

Updated: शुक्रवार, 30 जून 2023 (19:17 IST)
 
पुण्यात एमपीएससी पास झालेल्या तरुणीचा खून असो किंवा भरदिवसा एका तरुणीवर झालेला कोयता हल्ला असो पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत आहेत. कोयता गँग कशी जेरबंद करायची यावर तर विधानसभेसुद्धा चर्चा झाली. पण, म्हणून कोयता गँगची दहशत काही कमी झाली नाही.
 
त्यातच शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यात गेल्या सहा महिन्यांत 4,434 हजार मुली बेपत्ता झाल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीसांना याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
 
पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहेता यांच्या मते देवेंद्र फडणवीस यांची गृहखात्यावरील पकड सैल झाली आहे, असं म्हणायला वाव आहे.
 
ते सांगतात, “गेल्या 5 वर्षांत नागपूर क्राईम कॅपिटल अशी टीका व्हायची पण आता केवळ नागपूर नाही तर इतर शहरातही गुन्ह्यांच्या घटना घडू लागल्या आहेत ही चिंतेची बाब आहे.
पुण्यासारख्या ठिकाणी सर्रास कोयता घेऊन समाजकंटक फिरतायत. भाईगिरीचं आकर्षण किंवा टोळी वर्चस्व यातून हे घडतंय. अनेक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळतो.
 
कोयता बंदी करून हे प्रश्न सुटणार नाहीत. तर त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. तसंच पोलिसांचा वचक, गस्त, धाक, दरारा हे कृतीतून दिसलं पाहिजे.”
 
पण त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या आधीच्या पाच आणि आताच्या एक वर्षाच्या गृहमंत्रिपदाची तुलना करणं अन्यायकारक होईल, असं मेहता यांना वाटतं.
 
कोणत्याही नवीन सरकारमध्ये 6 महिने हनिमून पिरियड मानला जातो. म्हणजे 6 महिनेच धरले पाहिजेत, असं ते सागंतात.
 
“पण राज्यात अस्वस्थता आहे आणि पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्नही निर्माण व्हावा अशा काही घटना घडल्या आहेत. विशेषतः सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण, व्हॉट्स ऍपवर स्टेटस, ट्रोल याचं निमित्त होऊन घटना घडत आहेत आणि तिकडं लक्ष दिलं पाहिजे,” असं त्यांना वाटतं.
 
मेहेता यांच्या भूमिकेशी दैनिक लोकमतचे सहयोगी संपादक यदु जोशी काही अंशी सहमती दर्शवतात.
 
त्याचंसुद्धा म्हणणं आहे की 5 वर्षांची आणि एका वर्षाची तुलना करता येणार नाही.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात,
 
“मुळात पाच वर्षांच्या कारभाराची तुलना एक वर्षाशी करता येणार नाही. शिवाय फडणवीस सरकार हे मजबूत युतीचं सरकार होतं. विरोधक बरेच नाउमेद झालेले होते. शिंदे-फडणवीस सरकारला प्रचंड बहुमत आहे परंतु त्याचवेळी राज्यात राजकीय अस्थिरतादेखील आहे.
 
कधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तर कधी तपास यंत्रणांच्या होत असलेल्या कारवाया यावरून राजकारण टीकाटिपण्णी सुरू आहे. पक्षापक्षांमधील राजकीय वैर कधी नव्हे एवढे विकोपाला गेले आहे. त्यामुळे राजकीय तणाव मोठा आहे.”
 
त्याचवेळी धार्मिक आणि जातीय तणावाच्या वाढत्या घटनांवर मात्र परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळायला वाव असल्याचं सांगतात.
 
“संपूर्ण देशातच ज्या पद्धतीने हिंदू व हिंदूविरोधी राजकारणाचे ध्रुवीकरण होत आहे त्याचे पडसाद विविध राज्यात उमटत आहेत आणि महाराष्ट्रदेखील त्याला अपवाद नाही. जातीय तणावाच्या घटना केवळ महाराष्ट्रातच होत आहेत असे म्हणणे योग्य होणार नाही.
 
उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये तेथील सरकार जातीय तणावाच्या परिस्थितीत एकांगी असल्याचे दिसते तसे महाराष्ट्रात दिसत नाही. दोन्ही बाजूंच्या दंगेखोरांवर गुन्हे दाखल झाल्याची उदाहरणे या संदर्भात देता येतील. असं असलं तरी परिस्थिती अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता येण्यास वाव आहे.”
 
पण हेही तितकंच खरं आहे की, राज्यात टी. राजा सिंहासारखे भाजपने निष्कासित केलेले आणि चिथावणीखोर वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले नेते सभा घेत फिरत आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
 
फडणवीसांवर कामाचा बोजा?
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहबरोबरच वित्त, नियोजन, उत्पादन शुल्क, विधी व न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, ऊर्जा आणि राजशिष्ठाचार सारख्या 8 महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आहे.
 
शिवाय नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे आहे.
 
शिवाय ते राज्यातल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या बैठका आणि सभासाठी त्यांना राज्यभर आणि दिल्ली दौरे सतत करावे लागतात.
 
त्यामुळे त्यांच्यावर कामाचा बोजा वाढल्यामुळे त्यांचं गृहखात्याच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत आहे का?
 
अद्वैत मेहता यांच्या मते, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली अनेक खाती आणि उपमुख्यमंत्री जरी असले तरी ते या सरकारचा चेहरा आणि ड्रायव्हिंग फोर्स आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारीपण आहेच. तसंच कामाचा अतिरिक्त ताणही आहेच.
 
ते सांगतात, “गृहमंत्रिपद स्वतः कडे ठेवून एकप्रकारे आपण आव्हान स्वीकारतोय हा संदेश दिला जातो. तेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात गृहमंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडे नसायचं हे देवेंद्र यांचं वेगळेपण असलं तरी ते कृतीतून आणि कामातून दिसलं पाहिजे जे या वर्षभरात तरी दिसून आलेलं नाही.”
 
पण, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करून फडणवीसांना त्यांच्यावरील कामाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असं यदु जोशी यांना वाटतं.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात, “गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्या कामाचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. अतिरिक्त ताण म्हणाल तर तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आहे आणि बहुतेक मंत्र्यांवरदेखील आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हाच त्यावर एकमेव उपाय दिसतो.”
 
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जेव्हा कोल्हापुरात तणावाची स्थिती निर्माण झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून सर्वांना शांततेचं आवाहन केलं होतं.
 
पण त्याचवेळी त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना “अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? हे आपल्याला शोधावं लागेल, याच्यामागे कोण आहे, हे सुद्धा पाहावं लागेल, असं म्हटलं होतं.”
 
त्याचं हे वक्तव्य शुद्ध राजकीय वक्तव्य आहे. यातून हे स्पष्ट होतंय की गृहमंत्रिपद सांभाळतानाच त्यांना राजकीय भूमिका घेण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 
हे निव्वळ कामाचा भाग म्हणून त्यांच्याकडून होतंय की हे ठरवून केलं जाणारं राजकारण? असा प्रश्न यातून साहजिक निर्माण होतोय.
 
पण, त्याहून जनमानसात उमटणारा मोठा प्रश्न आहे तो म्हणजे – देवेंद्र फडणवीसांची गृहखात्यावर असलेली पकड सैल होत आहे का?
 Published By -Smita Joshi 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments